पिंपळे गुरव: काटेपुरम चौक परिसरातील जलतरण तलावाशेजारी असलेल्या एका सार्वजनिक स्वच्छतागृहाचा मार्ग दाखविण्यासाठी महापालिकेने तब्बल तीन दिशादर्शक फलक उभारले आहेत. एकाच स्वच्छतागृहासाठी ५०, १०० आणि २०० मीटर अंतरावर तीन फलक लावण्याची आवश्यकता काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, यातील एक फलक अक्षरशः पदपथावर लावण्यात आला असून, त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक लावणे आवश्यक असले तरी त्यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे. एका स्वच्छतागृहासाठी तीन फलक उभारले जात असताना दुसरीकडे शहरातील काही सार्वजनिक स्वच्छतागृहांजवळ दिशादर्शक फलकच नसल्याने नागरिकांना स्वच्छतागृह शोधण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फलकांची संख्या, खर्च, ठेकेदाराची माहिती जाहीर करा
महापालिकेने दिशादर्शक फलकांसाठी किती निधी खर्च केला, शहरात एकूण किती फलक बसविण्यात आले, कोणत्या ठेकेदारामार्फत हे काम करण्यात आले आणि एका स्वच्छतागृहासाठी किती फलक आवश्यक आहेत, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनावश्यक ठिकाणी लावलेले अतिरिक्त फलक हटवून ते गरज असलेल्या ठिकाणी बसवावेत, अशीही मागणी होत आहे.
पदपथ नागरिकांसाठी की फलकांसाठी?
एकीकडे नागरिकांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक उभारले जात असताना दुसरीकडे पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथावरच फलक उभारल्याने नागरिकांच्या सोयीचा नेमका विचार किती झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथ अडविणाऱ्या अशा फलकांची पाहणी करून त्यांची योग्य ठिकाणी पुनर्स्थापना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
फलक अडगळीत, नागरिकांची गैरसोय
'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातही दिशादर्शक फलक अडगळीत पडून असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेले फलक वापरण्याऐवजी कार्यालयाच्या आवारात पडून असतील, तर त्यासाठी खर्च करण्यात आलेल्या निधीचा नेमका उपयोग किती झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागरिकांच्या पैशांचा योग्य वापर व्हावा
करदात्या नागरिकांच्या पैशांतून होणाऱ्या प्रत्येक कामाचे योग्य नियोजन आणि उपयोग झाला पाहिजे. एकाच स्वच्छतागृहासाठी तीन फलक, त्यातील एक पदपथावर आणि दुसरीकडे फलकाविना स्वच्छतागृहे, हा विरोधाभास महापालिकेच्या कारभाराचे चित्र स्पष्ट करणारा आहे. संबंधित कामाची पाहणी करून अनावश्यक खर्च झाला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. एकीकडे सार्वजनिक स्वच्छतेसाठी विविध अभियान राबविली जात असताना दुसरीकडे दिशादर्शक फलकांच्या नियोजनातच विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे गरजेनुसार फलक की निधीची उधळपट्टी याचे उत्तर महापालिका प्रशासनाने देण्याची गरज आहे.