लोणावळा: लोणावळा नगर परिषद हद्दीसाठी लागू असलेला सध्याचा विकास आराखडा येत्या ऑगस्ट 2026 मध्ये आपली 20 वर्षांची मुदत पूर्ण करत आहे. कायदेशीर तरतुदींनुसार या आराखड्याचे पुनरावलोकन होणे आवश्यक असतानाही नगर परिषदेकडून अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नसल्याने शहराच्या विकासावर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष नासिर शेख यांनी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व मुख्याधिकारी अशोक साबळे यांना निवेदन देत तत्काळ आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
नव्या आराखड्याची गरज का आहे?
लोणावळा हे महाराष्ट्रातील एक अतिशय महत्त्वाचे आणि जागतिक पातळीवर ओळखले जाणारे पर्यटनस्थळ आहे. शहराचा वेगाने विस्तार होत आहे. येथील वाढती लोकसंख्या, पर्यटनामुळे निर्माण होणारा ताण, वाढती बांधकामे आणि पायाभूत सुविधांची तातडीची गरज पाहता शहरासाठी दूरदृष्टीचे नियोजन अत्यंत आवश्यक आहे. पर्यटक आणि स्थानिकांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था, अद्ययावत रुग्णालये आणि शाळा, सार्वजनिक सुविधा आणि उद्याने याचा प्रामुख्याने समावेश असलेला आराखडा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शहराचे वाढते नागरीकरण आणि पर्यटनाचा विचार करता शहराचा विकास आराखडा आधुनिक आणि नियोजनबद्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे लोणावळा शहरासाठी नवीन विकास आराखडा तयार करण्याची आणि विद्यमान आराखड्याचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी मागणी नासिर शेख आणि नगरसेवक जाकीर खलिफा यांनी केली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
याविषयी बोलताना नासिर शेख म्हणाले, की महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 38 नुसार, अस्तित्वात असलेल्या विकास आराखड्याचे 20 वर्षांनंतर पुनरावलोकन करून सुधारित विकास आराखडा तयार करणे हे कोणत्याही नियोजन प्राधिकरणाचे कायदेशीर आणि बंधनकारक कर्तव्य असते. मात्र, सद्यस्थितीत लोणावळा नगर परिषदेमार्फत या सुधारित आराखड्यासाठी कोणतीही पारदर्शक किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आलेले नाही. प्रशासनाचे हे दुर्लक्ष अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, ते संबंधित कायद्याच्या तरतुदींचे पालन करत नसल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.