

खराळवाडी: पिंपरी चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. परंतु याच स्मार्ट सिटीतील नागरिकांवर कोणी पाणी देता का पाणी अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शहर व उपनगरांत महापालिका प्रशासनाने टोलेजंग इमारती उभारण्यासाठी परवानगी दिली. नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून टॅक्स देऊन फ्लॅट खरेदी केले परंतु याच घरांत आज पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका करदात्या नागरिकांना बसत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात व उपनगरांत बहुतांश भागांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आहे. मार्च महिना सुरू होताच पिंपरी शहर, उपनगरांतील विविध ठिकाणी नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने महिन्यात शहर भीषण पाणीटंचाईकडे वाटचाल करतंय. जास्त प्रमाणात शहरात आतापासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा पिंपरी शहरातील नागरिकांना भोगावे लागतात. त्यापाठोपाठ खराळवाडी, गांधीनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा, वास्तूउद्योग यशवंतनगर, नेहरूनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, मोरवाडी, लालटोपीनगर परिसरातील वसाहतीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तरी आता परिस्थिती फारशी हाताबाहेर गेली नसली, तरी आगामी काळात उन्हाळा अजून वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शहरातील विविध भागांत टँकर माफियांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. यामुळे टँकर माफियाचे राज सुरू होताना दिसत आहे. येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे.
पवना धरणातील जलसाठा कमी होत आहे. विहिरी, बोअरवेल कोरडे पडत आहेत. ही टंचाई टँकर लॉबीला मालामाल करणारी ठरत आहे, तर दुसरीकडे नियमितपणे पाणीपुरवठा करण्याची घोषणाही फोल ठरली आहे. महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यामुळे पाणीपट्टी भरूनदेखील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कर्ज काढून घेतलेल्या फ्लॅटधारकांची मोठी गोची होऊ लागली आहे. पाण्यावर मोठा खर्च करावा लागत आहे.
टँकर लॉबी मालामाल
मार्च महिना सुरू होताच शहरात पाणीटंचाईचे स्वरूप आणखी तीव झाले आहे. अजून मार्च, एप्रिल, मे आणि जून महिने बाकी आहेत. आताच महापालिका शहरवासीयांना पिण्यापुरते देखील पुरेसे पाणी देत नाही. बहुतांश भागात पाणीपुरवठा करणारे कर्मचारी कृत्रिम पाणीपुरवठा करत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. यामुळे टँकरमालक मालमाल होऊ लागले आहेत तर नागरिक मेंटनन्स भरून वैतागले आहेत. बर्याच ठिकाणी तर प्रशासनही पाणी देत नाही आणि टँकरमालक देखील पुरेसे टँकर देत नसल्याने नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत.
पाण्यासाठी वणवण
शहरात मागील काही वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तो देखील पुरेसा होत नसल्याने नागरिकांनी कर कशाचा द्यायचा असा प्रश्न नागरिक करत आहेत. उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरण झाले आहे. उन्हाळ्यात महिला व पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. बैठी घरांमधील नागरिकांत पाण्यासाठी वणवण सुरू आहे तर मोठ्या सोसायटीतील कमिटीला पाणीप्रश्न कसा सोडवावा, ही डोकेदुखी ठरत आहे. लाखो रुपयांची घरी घेऊन पाण्यासाठी वाद करावे लागत आहेत.