संतोष शिंदे
पिंपरी : संकटकाळात ‘डायल 112’ हा क्रमांक फिरवला की मदतीसाठी पोलिस किती वेळात पोहोचतात? या प्रश्नाचे उत्तर आता अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सरासरी 6 मिनिटांच्या आत पोलिस मदत घटनास्थळी पोहोचत असून, त्यात हिंजवडी पोलिस ठाणे प्रथम (4:34 मिनिटे), वाकड द्वितीय (4:39 मिनिटे) आणि दिघी तृतीय (5:01 मिनिटे) ठरले आहे. वाढती लोकसंख्या, आयटी पार्क, औद्योगिक वसाहती, निवासी विस्तार आणि महामार्गावरील वाहतूक या सर्व आव्हानांमध्येही पोलिसांचा हा जलद प्रतिसाद नागरिकांना दिलासा देणारा ठरत आहे.
डायल 112 हेल्पलाइनवर जानेवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान तब्बल 1 लाख 53 हजार 247 कॉल प्राप्त झाले. विविध गुन्हे (31,622), महिलांशी संबंधित तक्रारी (30,612), मानसिक ताणतणाव व त्रास (23,672), रस्ते अपघात (13,031), विविध चौकशी (15,234), माहितीविषयक कॉल (7,863), चोरी (6,349), किरकोळ वाद (6,276), ज्येष्ठ नागरिक (3,309), लहान मुलांशी संबंधित (1,958) आणि आगीच्या घटना (711) अशा विविध प्रकारांमध्ये पोलिसांनी तत्परतेने मदत पोहोचवली आहे. डिसेंबर महिन्यात सर्वांधिक 14,685 कॉल आले, तर मार्च (13,082) आणि सप्टेंबर (13,521) महिन्यांतही कॉलचे प्रमाण जास्त होते. शहरासह ग््राामीण भाग, महामार्ग आणि निर्मनुष्य परिसर अशा सर्व ठिकाणी या सेवेचा प्रभावी वापर झाल्याची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे.
‘डायल 112’ वर आलेल्या प्रत्येक आपत्कालीन कॉलला आम्ही प्राधान्याने प्रतिसाद देतो. हिंजवडी पोलिस ठाण्याने 4:34 मिनिटांची सरासरी प्रतिसाद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला, याचे संपूर्ण श्रेय पोलिस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रभावी मार्गदर्शनाला आणि त्यांनी आखून दिलेल्या काटेकोर नियोजनाला जाते. आयटी पार्क, औद्योगिक वसाहती आणि वाढती लोकसंख्या असूनही नियंत्रण कक्षाशी समन्वय, पीसीआर वाहनांचे सुयोग्य नियोजन आणि बीट मार्शलची सतत गस्त यामुळे आम्हाला तातडीने घटनास्थळी पोहोचता येते. नागरिकांचा विश्वास कायम राखण्यासाठी आणखी जलद आणि परिणामकारक सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.बालाजी पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी
डायल 112 ही सेवा 24 बाय 7 कार्यरत आहे. कॉल कट झाल्यास तक्रारदाराशी पुन्हा संपर्क साधला जातो. तक्रारदाराचे समाधान होईपर्यंत कॉल बंद केला जात नाही. अत्याधुनिक वाहनांसह प्रशिक्षित अधिकारी व अंमलदारांचे पथक शहरातील प्रमुख चौकांत सतर्क असते. संकटाच्या क्षणी ‘पोलिस वेळेवर येतात का?’ हा नेहमीचा प्रश्न आता मागे पडताना दिसत आहे. आकडेवारीनुसार हिंजवडी, वाकड आणि दिघी या ठाण्यांनी सर्वांधिक जलद प्रतिसाद नोंदवला असून, इतर ठाण्यांचाही प्रतिसाद समाधानकारक असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. डायल 112 उपक्रमामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला नव्या वेगाची जोड मिळाल्याचे अधोरेखित झाले आहे.
पोलिस ठाण्यांची विभागणी आणि स्वतंत्र हद्दी निर्माण झाल्याने प्रतिसाद वेळेत स्पष्ट सुधारणा झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. हिंजवडी-बावधन, वाकड-काळेवाडी आणि पिंपरी-संत तुकारामनगर या विभाजनानंतर पोलिसांची उपस्थिती आणि नियंत्रण अधिक प्रभावी झाले आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात तातडीच्या मदतीसाठी कॉल केल्यानंतर पोलिस अवघ्या 4 मिनिटे 34 सेकंदांत घटनास्थळी पोहोचत आहेत. 2023 मध्ये बावधन पोलिस ठाण्याचे विभाजन झाल्यानंतर हिंजवडी हद्दीतील कामाचा भार कमी झाला आणि प्रतिसाद वेळेत लक्षणीय सुधारणा झाली. आयटी कंपन्या, रात्रपाळीतील कर्मचारी, वाहतूककोंडी आणि महामार्गालगतचा विस्तीर्ण परिसर लक्षात घेता हा वेळ उल्लेखनीय मानला जात आहे.
वाकड पोलिस ठाण्यानेही प्रतिसादाच्या बाबतीत प्रभावी कामगिरी करत 4 मिनिटे 39 सेकंदांची सरासरी वेळ नोंदवली आहे. वाकडचे विभाजन होऊन काळेवाडी पोलिस ठाणे निर्माण झाल्यानंतर वाकड हद्दीत प्रतिसाद अधिक वेगवान झाला. वाढती निवासी टाउनशिप, आयटी कर्मचारीवर्ग आणि महामार्गावरील सततची वाहतूक असूनही पोलिसांचा प्रतिसाद सातत्याने वेगवान राहिला आहे.
दिघी पोलिस ठाण्याने सरासरी 5 मिनिटे 01 सेकंदांचा प्रतिसाद वेळ नोंदवत तिसरा क्रमांक मिळवला आहे. औद्योगिक व निवासी भागांचा समतोल परिसर, सततची वाहतूक आणि नागरी विस्तार असूनही कमी वेळेत घटनास्थळी पोहोचण्यात दिघी पोलिसांनी सातत्य राखले आहे.