नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
नागालँडमध्ये दहशतवादी समजवून सर्वसामान्य नागरिकांना गोळ्या घातल्या गेल्या. केंद्र सरकारकडून आम्हाला गोळ्या घातल्या जात नाहीत, तर तुरुंगात डांबले जाते. केंद्रीय सरकारी यंत्रणांचा ससेमिरा लावून आमचा छळ सुरु आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ( दि. ६ ) केले.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांकडून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला जात आहे. नागालँडमध्ये सामान्य नागरिकांना दहशतवादी समजून गोळ्या घातल्या जातात. तर आम्हाला चुकीच्या आरोपांखाली तुरुंगात डांबले जात आहे.
पावसाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या खासदारांना हिवाळी अधिवेशनातही कारवाई का करण्यात आली, असा सवालही त्यांनी केला. तसेच हिवाळी अधिवेशनातील पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज बैठक घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.