sanjay- rana 
Latest

Rana v/s Raut : एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू राणा दाम्पत्य आणि संजय राऊत लडाखमध्ये आले एकत्र

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह धरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चांगलेच तापवले होते. तर राणा दाम्पत्याला बबली आणि बंटी अशी उपमा देऊन त्यांच्यावर टीकेचे बाण सोडून वातावरण ढवळून काढणारे शिवसेना खासदार संजय राऊत आज (गुरूवार) लडाख येथे संसदीय अभ्यास दौऱ्यावर आहेत.  (rana v/s raut) विशेष म्हणजे राणा दाम्पत्य आणि राऊत एकत्र नाष्टा करत असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्याच्यामध्ये काही चर्चा होते का ? याकडे साहजिकच मीडियासह सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.

(rana v/s raut)  दरम्यान, खासदार राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना देशासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर भाष्य केले. राऊत म्हणाले की, लडाखची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. जम्मू -काश्मीरचे प्रश्न वेगळे आहेत. तर लेह, लडाखचे प्रश्न वेगळे आहेत. काश्मीर आणि लडाख वेगळे विषय आहेत. लेह लडाखमध्ये कम्युनिकेशन सुरू होणे आवश्यक आहे. देशातील घडामोडी लेहच्या जनतेला कळू द्या, असे राऊत म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला दिलेल्या उत्तरावर बोलताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात योग्य आणि रोखठोक उत्तरे दिली आहेत. लोकशाही आहे, विरोधकांनी बोलत राहिले पाहिजे, लोकांच्या प्रश्नासाठी तोंडाचे भोंगे चालू राहिले पाहिजे. विरोधकांचे भोंगे समाजाच्या हितासाठी सुरू राहवेत. पण राज्यातील वातावरण बिघडविण्यासाठी भोंगे सुरू करू नका, असा टोला राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. महाराष्ट्राला एक परंपरा आहे. विरोधकांचा सन्मान केला जातो. ज्यावेळी महाराष्ट्राचे फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्हीही त्यांचा सन्मान ठेवला होता. आता त्यांनीही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना राऊत यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, सोमय्या विचार न करता वाटेल ते बोलतात. त्यांनी माझ्या मुलीवर आरोप केले. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांत तथ्य आढळल्यास सर्व संपत्ती दान करू. मुंबईत परत गेल्यावर सोमय्यांचे घोटळे उघड करणार आहे. सोमय्यांचे मोठे प्रकरण बाहेर काढण्याचा इशाराच राऊत यांनी यावेळी दिला. आम्ही राजकीय हेतूने अयोध्येत जात नाही, असाही टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. राज्यसभेसाठी यावेळी शिवसेनेचा उमेदवार देणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. मुंबईत काँग्रेसचा महापौर होता, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. यावर बोलताना मुंबईचा महापौर काँग्रेसचा कधी होता? असा उलट सवाल राऊत यांनी करून मुंबईत शिवसेनेचे राज्य कायम राहील, शिवसेनाच मुंबईचा राजा आहे, मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा येईल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT