अभ्यासात १ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ५,४३५ शहरांचे विश्लेषण
८०% शहरे 'अधिक स्वच्छ आणि अधिक समृद्ध'
१६% शहरे 'अधिक अस्वच्छ आणि अधिक समृद्ध'
भारतातील १५.३% शहरांमध्ये NO2 प्रदूषणात वाढ चिंताजनक
दिल्ली, मुंबई आणि कोलकाताचा समावेश 'अधिक स्वच्छ आणि अधिक समृद्ध' शहरांच्या यादीत
'अधिक स्वच्छ आणि अधिक समृद्ध' या श्रेणीमध्ये ७१९ शहरांसह चीन आघाडीवर
air pollution India Nature Cities report
बंगळूरु : भारतीय शहरांची वाढ ही प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाच्या (पेट्रोल-डिझेल आणि दगडी कोळसा) वापराशी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाशी निगडित राहिली आहे. परिणामी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. जगभरातील ३९० अधिक प्रदूषित आणि अधिक समृद्ध (dirtier and richer) शहरांपैकी १३८ शहरे (किंवा सुमारे ३५.४%) भारतात आहेत, असे भीषण वास्तव 'नेचर सिटीज' (Nature Cities) या नियतकालिकात प्रकाशित रिपोर्टमध्ये मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे चीनमधील (७१९ शहरे ) आणि इतर अनेक देशांनी स्वच्छ शहरीकरणाच्या बाबतीत आघाडी घेतली असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
'नेचर सिटीज' (Nature Cities) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासामध्ये जगभरातील ५,४३५ शहरांचा अभ्यास करण्यात आला. २०१९ ते २०२४ या काळातील उपग्रहांचा डेटा, नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण आणि शहरांचे एकूण आर्थिक उत्पन्न (GDP) यांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
संशोधकांनी वाहने, उद्योग आणि औष्णिक वीज प्रकल्पांतून निघणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साइडच्या (NO2) उपग्रहीय नोंदी घेतल्या. त्यांची तुलना शहरांच्या जीडीपीशी केली. त्यानुसार शहरांचे स्वच्छ आणि श्रीमंत (Cleaner & Richer), प्रदूषित आणि श्रीमंत (Dirtier & Richer), स्वच्छ आणि गरीब (Cleaner & Poorer) आणि प्रदूषित आणि गरीब (Dirtier & Poorer) अशी वर्गवारी करण्यात आली. अभ्यासात समाविष्ट केलेल्या ९०२ भारतीय शहरांपैकी १५.३% शहरांमध्ये २०१९ ते २०२४ दरम्यान NO2 च्या पातळीत झालेली वाढ चिंताजनक आहे. 'प्रदूषित आणि श्रीमंत' श्रेणीत भारताचा वाटा जगात सर्वाधिक (३५.४%) आहे. संशोधकांच्या मते, "ही अपयशी शहरे नसून वेगाने वाढणारी शहरे आहेत, पण त्यांची वाढ प्रदूषणासोबत होत आहे. तसेच, भारत 'प्रदूषित आणि गरीब' या सर्वात चिंताजनक श्रेणीतही दिसला, जिथे आर्थिक प्रगती खुंटली आहे पण प्रदूषण वाढत आहे.
जगभरातील ३९० शहरे 'अधिक प्रदूषित आणि अधिक श्रीमंत' या श्रेणीत आली आहेत. म्हणजेच, येथे आर्थिक विकास तर झाला, पण सोबतीने प्रदूषणही वाढले. विशेष म्हणजे, या ३९० शहरांपैकी १३८ शहरे (सुमारे ३५.४%) एकट्या भारतात आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या महानगरांनी 'स्वच्छ विकास' (Cleaner Growth) दाखवला असला, तरी भारतातील इतर अनेक शहरे अजूनही वाहतूक, उद्योग आणि वीज निर्मितीसाठी कोळसा, पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, जगातील पहिल्या १० 'प्रदूषित आणि श्रीमंत' शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील नाशिक शहराचा समावेश आहे.
याउलट, जागतिक पातळीवर ८०% शहरे ही 'स्वच्छ आणि श्रीमंत' या श्रेणीत आहेत. या शहरांचा आर्थिक विकास झाला त्याचबरोबर प्रदूषण कमी झाले.
मे महिन्यात मुंबईत हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (AQI) ५२ (म्हणजेच समाधानकारक) नोंदवला गेला. मात्र बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील (BKC) एअर मॉनिटरिंग स्टेशनवर मात्र तब्बल १६२ AQI ची नोंद झाली. इतर भागांच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे. (बांद्रा पूर्व: ३५ AQI, कुर्ला: ९१ AQI आणि पवई १९ AQI सह सर्वात स्वच्छ). पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, बीकेसीमधील प्रचंड वाहतूक कोंडी, उंच इमारती आणि दाट शहरीकरणामुळे तेथील दूषित हवा बाहेर पडू शकत नाही. तसेच, मुंबईच्या इतर भागांत धुलीकणांचे (PM2.5 आणि PM10) प्रमाण जास्त असते, मात्र बीकेसीमध्ये नायट्रोजन डायऑक्साइड, अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त आढळले आहे.