इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हनिमूनसाठी मेघालयमध्ये गेले असता पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi ) हिने तिघांच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली आहे. सोनमचे वडील देवी सिंह यांनी आपल्या मुलीवर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच त्यांनी मेघालयच्या पोलिसांवर गंभीर आरोपही केला आहे.
माध्यमांशी बोलताना देवी सिंह म्हणाले की, सोनम रघुवंशी हत्या प्रकरणी मेघालयचे मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. त्यांचीही सीबीआय चौकशी झाली पाहिजे. मला खात्री आहे की मुख्यमंत्रीही खोटे बोलत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लवकरात लवकर सीबीआय चौकशीसाठी पथक पाठवावे. मेघालय पोलिस खोटे बोलत आहेत. त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. राजा रघुवंशीच्या हत्येत मेघालय पोलिसांचा सहभाग आहे याची मला खात्री आहे.
"सोनमने त्याचा भाऊ गोविंदला फोन केला. त्याने मला सांगितले की, सोनम गाजीपूरमधील एका ढाब्यावर सापडली आहे. केंद्र सरकारला सरकारला माझी विनंती आहे की, याप्रकराची सीबीआय चौकशी करावी. मी राजा रघुवंशीच्या कुटुंबाशी बोललो नाही. लग्नापूर्वी सोनम आणि राजा एकमेकांना ओळखत नव्हते. मी माझ्या मुलीशी बोलू शकलो नाही. फक्त माझा मुलगा गोविंद पहाटे २ वाजताच्या सुमारास सोनमशी बोलला. सोनम स्वतःहून गाझीपूरमधील ढाब्यावर पोहोचली. मेघालय पोलिस या प्रकरणात सोनमला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सीबीआय चौकशी झाली तर मेघालयातील पोलिस स्टेशनचे अधिकारी तुरुंगात जातील, असा दावाही देवी सिंह यांनी केला आहे.
राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी संध्याकाळपासून ते चेरापुंजी जवळील ओसारा हिल्स येथून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटुंबाशी संपर्क झाला नाही.राजा रघुवंशी यांचा मृतदेह ११ दिवसांनंतर शिलाँगमधील एका पर्यटनस्थळी २०० फूट खोल दरीत झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ड्रोनच्या मदतीने त्यांचा मृतेदह शोधून काढण्यात आला. नवदाम्पत्यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची आणि सोनमचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी केली होती.
राजा सूर्यवंशी यांच्या आईने सोनम सोबतचे त्यांचे शेवटचे बोलणे झाल्याचे सांगितले होते. त्यांनी २३ मे रोजी उपवासाचा दिवस असल्याने तिची विचारपूस करण्यासाठी फोन केला होताया कॉलचे रेकॉर्डिंग त्यांच्या कुटुंबाने शेअर केले आहे. ज्यात सोनमचा आवाज श्वास घेताना दमल्यासारखा ऐकू येतो. धबधबा पाहण्यासाठी जंगलात ट्रेकिंग करत असल्याचे तिने म्हटले होते. तिने नंतर फोन करते असे सांगितले;पण त्यानंतर तिचा कॉल आलाच नाही.
इंदूरमधील नवदांपत्य हनिमूनला गेले असता बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. मात्र पतीचा मृतदेह मिळाल्यानंतर हे प्रकरण प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले. मुसळधार पावसात मेघालय पोलिसांना ड्रोनद्वारे राजाचा मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेला असल्याचे त्याची ओळख पटवणे माेठे आव्हानात्मक हाेते. राजा सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने टॅटूद्वारे मृतदेहाची ओळख पटवली. पत्नी साेनम बेपत्ता हाेती. तिचाही घातपात झाला आहे. या दिशेने पाेलिसांनी तपास सुरु केला. एसडीआरएफ, स्पेशल ऑपरेशन टीम आणि माउंटेनियरिंग क्लब शोध मोहिमेत सहभागी होते. राजा आणि सोनम यांनी भाड्याने घेतलेल्या दुचाकी मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून २५ किलोमीटर अंतरावर सापडली. त्यामुळे या प्रकरणात संशय वाढला. राजा सूर्यवंशी यांचा मोबाईल फोन, सोन्याची चेन आणि अंगठी त्याच्या मृतदेहाजवळ सापडली नाही. फक्त त्याचे स्मार्टवॉच आढळले होते. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे झाले होते. अखेर सात दिवसानंतर या प्रकरणाचे गूढ उकलले करण्यात पाेलिसांना यश आले आहे.
मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी 'एक्स' वर लिहिले आहे की, राजा हत्याकांडात पोलिसांना सात दिवसांत मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. महिलेने आत्मसमर्पण केले आहे. दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्याची मोहीम अजूनही सुरू आहे.
या प्रकरणी माहिती देताना मेघालयाच्या पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले की, सोनम सूर्यवंशीने उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे, तर रात्रीच्या वेळी केलेल्या छाप्यात इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली. अन्य दोन आरोपींना एसआयटीने इंदूरमधून पकडले आहे. सोनमने उत्तर प्रदेशातील नंदगंज पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. यानंतर तिला अटक करण्यात आली. पत्नीनेच राजा रघुवंशी यांच्या हत्येसाठी तिघांना सुपारी दिली होती. गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी काही लोकांना पकडण्यासाठी मध्य प्रदेशात अजूनही कारवाई सुरू आहे.