Ebola Global Health Emergency
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) रविवारी (दि. १८) इबोलाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' घोषित केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये ३०० हून अधिक संशयित रुग्ण आणि ८८ मृत्यूंची नोंद झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. 'X' (ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये WHO ने माहिती दिली की, काँगोची राजधानी 'किन्शासा' येथेही प्रयोगशाळेत पुष्टी झालेला एक रुग्ण आढळला आहे. किन्शासा हे शहर या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या पूर्व प्रांत 'इटुरी'पासून सुमारे १,००० किलोमीटर (६२० मैल) दूर आहे. यामुळे हा आजार आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे की, "कोणत्याही देशाने आपल्या सीमा बंद करू नयेत किंवा प्रवास आणि व्यापारावर निर्बंध आणू नयेत. अशी पावले सामान्यतः भीतीपोटी उचलली जातात आणि त्यांचा विज्ञानाशी काहीही संबंध नसतो. अशा निर्णयांमुळे लोकांची आणि मालाची वाहतूक अनधिकृत किंवा अनौपचारिक सीमा तपासणी नाक्यांकडे वळते, जिथे कोणतीही देखरेख नसते. यामुळे हा आजार पसरण्याचा धोका उलट अधिक वाढतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या निर्बंधांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचू शकते. तसेच सुरक्षा आणि लॉजिस्टिक्सच्या (वाहतूक व व्यवस्थापन) दृष्टीने मदतकार्यावरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो."
दरम्यान, भारतीय तज्ज्ञांच्या मते घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, कारण इबोला हा कोविड-१९ (Covid-19) सारखा हवेतून किंवा वेगाने पसरत नाही. तरीही, खबरदारी बाळगणे आणि आजाराचे लवकरात लवकर निदान करणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' (NCDC) या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. २०१४ मध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा अपवाद वगळता, भारतात आतापर्यंत इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
एम्सचे (AIIMS) माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, इबोला विषाणू संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रव पदार्थ, जसे की रक्त, उलट्या, स्राव किंवा दूषित वस्तूंच्या थेट संपर्कात आल्यामुळे पसरतो. त्यामुळे हा आजार कोविड-१९ पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, जो मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने पसरत होता. सध्या घाबरण्याची अजिबात गरज नाही. इबोला पसरण्यासाठी अतिशय जवळचा शारीरिक संपर्क आवश्यक असतो, त्यामुळे याचे कोविड-१९ सारख्या जागतिक महामारीत रूपांतर होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
२०१४ मधील इबोलाच्या प्रादुर्भावा दरम्यान भारताने केलेल्या तयारीची आठवण करून देत ते म्हणाले की, तेव्हा अधिकाऱ्यांनी देशभरात स्क्रिनिंग मोहिमा आणि कार्यशाळा (Workshops) आयोजित केल्या होत्या. त्यांनी सिएरा लिओनहून परतलेल्या एका भारतीय प्रवाशाचा दाखला दिला,इबोलातून बरे झाल्यानंतरही दिल्लीत विलगिकरणात ठेवण्यात आले होते; कारण त्याच्या शरीरातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांमध्ये सलग विषाणूचे कण आढळत होते.खबरदारीचा उपाय म्हणून तो प्रवासी सुमारे तीन महिने विलगिकरणात होता. मात्र, त्यानंतर संसर्ग पसरल्याचे कोणतेही इतर प्रकरण समोर आले नाही. इबोलाचा प्रसार सहसा संक्रमित वटवाघुळ किंवा जंगली प्राण्यांशी संबंधित असतो आणि संक्रमित मृतदेहांना स्पर्श केल्याने देखील हा आजार पसरू शकतो, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले. बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी (Screening) करणे आणि विषाणूच्या २१ दिवसांच्या इन्क्युबेशन पिरियडवर (संसर्गाची लक्षणे दिसण्यापूर्वीचा काळ) लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एम्समधील मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल म्हणाले, "एकूणच भारताला असलेला धोका कमी आहे, परंतु आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात संसर्गजन्य आजारांचा प्रसार खरोखरच केवळ एका विमान प्रवासाच्या अंतरावर आहे. विमानतळांवरील देखरेख, प्रवासादरम्यानची तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या महत्त्वाचे आहे. बोलाचे रुग्ण सामान्यतः लक्षणे दिसू लागल्यानंतरच संसर्ग पसरवू शकतात; विशेषतः जेव्हा त्यांना ताप, उलट्या, अतिसार किंवा रक्तस्त्राव यांसारख्या समस्या असतात. इबोलाची सुरुवातीची लक्षणे ही इतर सामान्य व्हायरल आजारांसारखीच असतात, म्हणूनच या आजाराचा अचूक शोध घेण्यासाठी रुग्णाचा प्रवास आणि तो कोणाच्या संपर्कात आला होता याची माहिती असणे अत्यंत आवश्यक ठरते.
इबोला संसर्गामध्ये म्हणजे विषाणूच्या संपर्कात येणे यानंतर आजाराची लक्षणे दिसणे यामधील काळ सामान्यतः २ ते २१ दिवसांचा असतो.
हा आजार सहसा अचानक सुरू होतो. यामध्ये ताप, थकवा, अशक्तपणा, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसतात.
आजार वाढतो, तसे रुग्णांना उलट्या, अतिसार (जुलाब), पोटदुखी, त्वचेवर पुरळ उठणे आणि किडनी किंवा लिव्हर नीट काम न करणे अशा समस्या उद्भवू शकतात.
गंभीर प्रकरणांमध्ये शरीराच्या आतून आणि बाहेरून रक्तस्त्राव होऊ शकतो. यामध्ये उलटी किंवा शौचामधून रक्त येणे आणि नाक, हिरड्या किंवा योनीतून रक्तस्त्राव होणे समाविष्ट आहे.
जे लोक इबोलातून बरे होतात, त्यांना प्रदीर्घ काळ आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. यामध्ये सतत थकवा जाणवणे, डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखी, डोळ्यांच्या समस्या (उदा. अंधुक दिसणे, डोळे दुखणे किंवा प्रकाशाचा त्रास होणे), तसेच पोटदुखी, भूक न लागणे आणि वजनात बदल होणे या गोष्टींचा समावेश होतो.