अजय ढवळे
वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील राजुरा गावात गेल्या २० ते २५ दिवसांपासून एका जुन्या बोअरवेलमधून चक्क गरम पाणी येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल १२ वर्षे जुना असलेल्या या बोअरवेलमधून अचानक गरम पाणी येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हे पाणी आंघोळीसाठी वापरता येईल इतपत गरम असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राजुरा येथील या बोअरवेलमधून यापूर्वी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाण्याचे तापमान अचानक वाढल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला ग्रामस्थांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही; मात्र सातत्याने गरम पाणी येत असल्याने या घटनेची चर्चा संपूर्ण गावात सुरू झाली.
या प्रकाराची माहिती मिळताच आरोग्य विभागाने बोअरवेलमधील पाण्याचे नमुने घेतले. प्राथमिक तपासणीत हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. तसेच पाण्यातील काही रासायनिक घटकांचे प्रमाण वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची अधिक गांभीर्याने दखल घेतली आहे.
दरम्यान, पाण्याचे नमुने पुढील सखोल तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणी अचानक गरम होण्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भूगर्भातील नैसर्गिक प्रक्रिया, रासायनिक बदल किंवा अन्य काही कारणामुळे पाण्याचे तापमान वाढले आहे का, याबाबत सध्या विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र अधिकृत तपासणी अहवाल येईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य ठरणार नाही.
गरम पाण्याचा हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांकडूनही उत्सुकता व्यक्त केली जात आहे. मात्र पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नागपूरच्या प्रयोगशाळेतील अहवालाकडे आता ग्रामस्थांसह प्रशासनाचे लक्ष लागले असून, या बोअरवेलमधून अचानक गरम पाणी येण्याचे गूढ नेमके काय, याचा उलगडा अहवालानंतरच होणार आहे.