चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवनात (24 वर्षीय) तरुणीची प्रेमप्रकरणातून हत्या केलेल्या आरोपीने बुटाच्या लेसने वरोरा पोलिस ठाण्याच्या कोठडीत जीवन संपवले. ही घटना आज (रविवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकिस आली. या घटनेने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. समाधान माळी (रा.जळगाव) असे मृत आरोपीचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवनात कुष्ठरोगी बांधवांची सेवा ही जनसेवा म्हणून केली जाते. याच आनंदवनात आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीचे आई-वडील राहत होते. त्यांच्यासोबत 24 वर्षीय आरती राहायची. आई-वडिलांचा उपचार करतेवेळी आरतीचे प्रेम संबंध जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील समाधान माळी या युवकासोबत जुळले. समाधान हा स्वतःचा उपचार करण्यासाठी आनंदवनात आला होता, विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा.
आनंदवनाच्या आश्रमात समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सहा महिन्यापर्यंत सुरू असतानाच अचानक आरतीने समाधानला दूर सारून अन्य युवकासोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणाची माहिती समाधानला लागली. त्यामुळे दोघात वादाला तोंड फुटले. 26 जूनला आरतीचे आई-वडील वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे कामानिमित्त गेले असतानाच समाधानने आरतीच्या घरी जावून भांडण केले आणि आरतीच्या गळ्यावर, हातावर चाकूने वार करुन तीची हत्या केली.
वरोरा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करीत तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्सच्या आधारे 24 तासाच्या आत आरोपी समाधान माळी याला अटक केली. वरोरा न्यायालयात आरोपीला सादर करून या प्रकरणाच्या चौकशीसाठी 4 जुलै पर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. आरोपी समाधान माळी पोलिस कोठडीत असतानाच आज रविवारी त्याने कोठडीत बुटाच्या लेसणे त्याने आपले जीवन संपवले. प्रेमप्रकरणातून प्रियसीची हत्या केल्यानंतर आज त्याने स्वतः जीवन का केली? याचे कारण अद्याप समोर आले नाही.
आनंदवनात आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी राहत असलेल्या आरती नावाच्या तरुणीची तिथेच उपचारासाठी आलेल्या आणि केअर टेकर असलेल्या समाधान माळी नावाच्या युवकांनी प्रेम प्रकरणातून हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आरोपी समाधान माळी हा सध्या वरोरा पोलिसांच्या ताब्यात होता. चौकशी करता त्याची सात दिवसांची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. त्यामुळे तो पोलीस ठाण्याच्या कोठडीत असतानाच आज रविवारी त्यांनी आत्महत्या केली आहे.
पोलीस कोठडीत असताना आरोपींवर पोलिसांची करडी नजर असते. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. आरोपीकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस निगराणी असते. हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपीनेच पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याने वरोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती वरिष्ठांना होताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्यासह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.