नागपूर मुंबई समृद्धी महामार्गच्या अखेरच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा इगतपुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार असताना, या महामार्गाशी जोडलेल्या शहापूर एक्झिट परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे. खुटघर ते शहापूर दरम्यानचा अवघा तीन किलोमीटरचा मार्ग खड्डेमय झाला आहे.या पार्श्वभूमीवर, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी समृद्धी महामार्गावर कसारा येथे स्वतंत्र इमर्जन्सी एक्झिट देण्याची मागणी प्रवासी आणि स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.
शहापूर एक्झिटला जोडणारा खुटघर, दोऱ्याचा पाडा, शहापूर हा सिमेंट रस्ता अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असून, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची गुणवत्ता ढासळल्याचा आरोप करण्यात येत आहे. सापगाव येथील भातसा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, त्यावर संरक्षक कठडेही नाहीत. रात्रीच्या वेळी येथे अंधार असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढतो. पावसाळ्यात भातसा धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर हा पूल अनेकदा पाण्याखाली जातो, परिणामी शहापूरशी संपर्क तुटतो. तसेच कांबारे पावरहाऊसजवळील आवरे नदीवरील पूलही तितकाच धोकादायक असून, मुसळधार पावसात येथे वाहतूक बंद करण्याची वेळ येते.
स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेनुसार, पुलांची सध्याची अवस्था पाहता सावित्री नदी पूल दुर्घटना सारखी घटना येथे घडण्याची भीती नाकारता येत नाही. विशेषतः सापगाव येथील पूल दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना आवश्यक असल्याची मागणी होत आहे. स्थानिकांच्या मते, कसारा येथे ज्या ठिकाणी ठेकेदार कंपनीचा बेस कॅम्प आहे, त्या ठिकाणापासून अवघ्या 50 मीटरवर समृद्धी महामार्ग आणि सुमारे 250 मीटरवर मुंबईनाशिक जुना महामार्ग आहे. अशा परिस्थितीत येथे एक्झिट देणे तांत्रिकदृष्ट्या सोपे आणि कमी खर्चिक असतानाही ती व्यवस्था करण्यात आलेली नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.एकूणच, समृद्धी महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर जोडरस्ते आणि सुरक्षा व्यवस्था सक्षम असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विकासाच्या या महामार्गावरच अपघात आणि संकटांचा वेग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
1) समृद्धी महामार्गावर कसारा-इगतपुरी दरम्यान महाकाय बोगदे असून, या लांब पट्ट्यात एक्झिटची संख्या अत्यल्प आहे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद मिळण्यासाठी कसारा येथे इमर्जन्सी एक्झिट असणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
2) महाकाय बोगद्यांमध्ये अपघात किंवा आपत्ती घडल्यास ‘गोल्डन अवर’मध्ये मदत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी कसारा एक्झिट जीवनरक्षक दुवा ठरू शकतो. त्यामुळे भविष्यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कसारा येथे तातडीने इमर्जन्सी एक्झिट उभारावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.
- या आहेत तातडीच्या उपाययोजनांची गरज
- शहापूर एक्झिटला जोडणारे रस्ते तात्काळ दुरुस्त करणे
- भातसा व आवरे नदीवरील पुलांची दुरुस्ती व संरक्षक कठडे बसवणे
- अपूर्ण सिमेंट रस्त्यांचे काम पूर्ण करणे
- पावसाळ्यापूर्वी सुरक्षा उपाययोजना राबवणे
- कसारा येथे इमर्जन्सी एक्झिटची निर्मिती
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून शहापूर-मुरबाड रस्ता सिमेंटचा करण्याचे काम सात वर्षांपूर्वी सुरू झाले होते. मात्र आजही हा रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या मार्गावर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढणार असून, सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.