

ठाणे : रविवारी सुट्टीच्या दिवशीच पहाटेपासूनच घोडबंदर, वसंत विहार आणि कोलशेत या भागांचा वीजपुरवठा तब्बल पाच तास खंडित झाला होता. पहाटे सहा वाजल्यापासून खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत करण्यासाठी साडेअकरा वाजले. घोडबंदर येथील पातलीपाडा उपकेंद्राशी संबंधित असलेली पडघा येथील वीज वाहिनी ट्रिप झाल्याने वीज पुरवठा झाला खंडित झाल्याचे कारण देण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे 65 ते 70 हजार वीज ग्राहकांना याचा फटका बसला.
आधीच उन्हामुळे गर्मीच्या झळा सोसणाऱ्या ठाणेकरांना रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळी पाच तास गर्मीत काढावे लागले. वीजपुरवठा पहाटे सहा वाजताच खंडित झाल्याने काय करावे हे नागरिकांना समजलेच नाही. लाईट आता येईल थोड्या वेळाने येईल या प्रतीक्षेत नागरिकांनी पाच तास काढले. अखेर पाच तासांनी हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
या बिघाडामुळे कोलशेत, वसंत विहारच्या दोन्ही बाजूचा, घोडबंदर येथील मानपाडा, पातलीपाडा, कासारवडवली, ओवळा आणि पुढे गायमुख पर्यंत हा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे या सर्व परिसरातील 65 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना या सर्व प्रकारचा फटका बसला.
घोडबंदर परिसरातील पातलीपाडा येथील उपकेंद्राशी संबंधीत असलेल्या पडघा येथील वीजवाहिनी ट्रिप झाल्याने हा सर्व प्रकार घडला. पडघा येथील वीजवाहिनीत ट्रिप झाल्याने याचा भार पातलीपाडा येथील वीजवाहिनीला सहन न झाल्याने हा वीजपुरवठा खंडित झाला.