सापाड : योगेश गोडे
कल्याण शहरातील नागरी समस्यांमध्ये भर टाकणारी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेत उघडकीस आली आहे. इमारतीमधील फक्त दहा टक्के रहिवाशांनी मालमत्ता कर न भरल्याच्या कारणावरून संपूर्ण इमारतीचे पाणी कनेक्शन तोडण्यात आले असून ऐन रमजान सणासुदीच्या दिवसात अधिकाऱ्यांनी रहिवाशांवर केलेली दादागिरी गुंडशाहीचे लक्षण असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी अशरफ शेख यांनी केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गुंडशाही प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना पत्री पूल परिसरातील सर्वोदय सागर इमारतीमध्ये घडली असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कथित अरेरावी आणि दादागिरीचा हा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सर्वोदय सागर या निवासी इमारतीत एकूण 112 कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यापैकी तब्बल 102 रहिवाशांनी आपला मालमत्ता कर वेळेत भरलेला आहे. मात्र उर्वरित केवळ 10 रहिवाशांकडे कर थकीत असल्याचे कारण देत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘क’ प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण इमारतीचा पाणीपुरवठा खंडित करून रहिवाशांना मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, पाणी कनेक्शन तोडण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची अधिकृत नोटीस पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली नसल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. सामान्यतः अशा प्रकारच्या कारवाईपूर्वी संबंधितांना नोटीस देणे, मुदत देणे आणि त्यानंतरच कठोर पावले उचलणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात कोणतीही पूर्वसूचना न देता थेट संपूर्ण इमारतीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे.
इमारतीतील स्थानिक रहिवाशांच्या मते, आम्ही वेळेत कर भरतो, तरी काही मोजक्या लोकांमुळे संपूर्ण इमारतीला शिक्षा का? महापालिकेची ही कारवाई अन्यायकारक असून ती तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महापालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारी हे कर वसुलीसाठी दबाव तंत्र वापरत असून नागरिकांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘कर भरा, अन्यथा पाणी कापले जाईल,’ अशा प्रकारच्या इशाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही अधिकारी प्रत्यक्ष इमारतीत येऊन आक्रमक पद्धतीने वर्तन करत असल्याचेही अनुभव आले आहेत. यामुळे प्रशासनाविषयीचा विश्वास डळमळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे ही कारवाई ईद सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे. ईदनंतरचा रविवार असल्यामुळे बँका बंद होत्या. त्यामुळे काही रहिवाशांना तत्काळ कर भरणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत थोडी मुदत देण्याऐवजी थेट पाणीपुरवठा खंडित केल्यामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘सणाच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवण्याऐवजी आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही आमच्यासाठी मोठी शिक्षा आहे,’ अशी भावना एका रहिवाशाने व्यक्त केली. कायद्यानुसार महापालिकेला कर वसुलीसाठी विविध उपाययोजना करण्याचे अधिकार असले तरी संपूर्ण इमारतीला शिक्षा देणे हा उपाय कितपत न्याय्य आहे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘ज्यांनी कर भरलेला आहे, त्यांना अशा प्रकारे शिक्षा देणे हे अन्यायकारक ठरू शकते. प्रशासनाने थकबाकीदारांवर स्वतंत्र कारवाई करणे अपेक्षित आहे.’ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. ‘जर तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला नाही, तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
ईद सणानिमित्ताने आम्ही परिवारासोबत उत्सव साजरा करत होतो. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे बँका बंद होत्या. मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची नोटिसा न देता आमच्या इमारतीवर कर वसुलीसाठी आले. दहा टक्के नागरिकांनी कर भरला नसल्यामुळे संपूर्ण इमारतीचे पाणी कनेक्शन कट करण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्याशी गैर वर्तणूक करून आम्हाला धमकावून पाणी कनेक्शन कट केले आहे. त्यांनी आम्हाला चोर म्हटल्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार आहोत.अशरफ शेख, स्थानिक रहिवासी