रायगड जिल्ह्यातील काळ, बाळगंगा, कोंढाणे, सांबरकुंड यासारखे धरण प्रकल्प निरनिराळ्या कारणांनी रखडले आहेत. तसेच महाड शहरासह तालुक्याच्या पुढील किमान 50 वर्षांचा पाणी प्रश्न निकाली काढणाऱ्या कोथेरी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या धरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे अशी महाडकरांची मागणी आहे. प्रलंबित असलेला हा प्रश्न काळ व नागेश्वरी प्रकल्पांसारखा शासनाने जटील करू नये, अशी मागणी महाडकरांनी केली आहे. त्यामुळे हे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे आव्हान राज्य सरकार समोर असणार आहे.
दरम्यान महाडमधील धरण प्रकल्पांतील ज्या प्रकल्प बाधितांच्या पर्यायी जमिनी संदर्भातील समस्यांची पूर्तता होणे बाकी आहे ते येत्या पंधरा दिवसात झाल्यास त्यानंतरच्या 75 दिवसात या प्रकल्पाचा घळभरणी कार्यक्रम करणे शक्य होईल अशी माहिती या विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
यामुळे कोथेरी धरणाचा प्रकल्प काळ व नागेश्वरी या रखडलेल्या प्रकल्पांच्या मार्गावर जाऊ नये असे शासनाला वाटत असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा महाडकर नागरिक व्यक्त करीत आहेत.
महाड तालुक्याच्या 2025 नंतर पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्कालीन आमदार स्वर्गवासी माणिकराव जगताप यांच्या प्रयत्नातून तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कोथेरी धरणाची प्रस्तावित 90 टक्के पेक्षा जास्त कामे पूर्ण झाली असून प्रकल्प बाधितांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांना शासनाने त्वरित मंजुरी देऊन या धरणाची घळभरणी कार्यक्रमास परवानगी द्यावी असे आवाहन महाड मधील नागरिकारांकडून करण्यात येत आहे. महाड शहराच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या कोथेरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला 2007 मध्ये तत्कालीन आमदार स्वर्गवासी माणिकराव जगताप यांच्या दूरदृष्टीतून सुरुवात करण्यात आली होती. मात्र कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर 2016 पर्यंत प्रथम 120 कोटी रुपये खर्चाचा असलेला हा प्रकल्प 212 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेपर्यंत पोहोचला होता.
सद्यस्थितीमध्ये या प्रकल्पाची 90 टक्के पेक्षा जास्त कामे पूर्ण झाली असून राज्याच्या इतिहासात प्रथमच प्रकल्प बाधितांना पुनर्वसन गावठाणा ऐवजी थेट रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. सन 1995 ते 2000 या कालावधीमध्ये महाड तालुक्यात काळ व नागेश्वरी या धरणाच्या कामांना मान्यता मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली होती. कोथेरी प्रकल्पाचे कामास सन 2007 मध्ये सुरुवात झाली असून ही तीनही धरणे आज अपूर्ण अवस्थेत असून आज या धरणांच्या पूर्णत्वासाठी शासनाला हजारो कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. कोथेरी प्रकल्पाच्या कामास काळ व नागेश्वरी या प्रकल्पांच्या नंतर सुरुवात होऊन देखील कोथेरी प्रकल्पाचे काम अंतिम घळभरणीच्या टप्प्यात आहे.
काही वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या सिंचन घोटाळयामध्ये काळ जलविद्युत प्रकल्पाचा समावेश संबंधित धरणाच्या काम करणाऱ्या ठेकेदारा विरोधात शासनाने केलेल्या न्यायालयीन प्रक्रिये मुळे झाला होता.
शासनाने आगामी आठ दिवसात या संदर्भातील प्रकल्प बाधितांच्या असलेल्या समस्यांची पूर्तता केल्यास पुढील दोन महिन्यांमध्ये घळभरणीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया करणे शक्य होईल अशी माहिती या प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. हा प्रकल्प महाड शहरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोथेरी प्रकल्पाचा लाभ ईसाने कांबळे ते मुठवली या अकरा गावातील जनतेला प्राधान्याने होणार असून सुमारे 540 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. 8.80 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा यामध्ये केला जाणार असून यापैकी 1.61 दशलक्ष घनमीटर साठा महाड शहराच्या पुढील पन्नास वर्षांच्या आवश्यकतेनुसार राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील दहा वर्षात महाड शहरांमध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील विविध विभागांमध्ये अशा पद्धतीच्या लघुपाटबंधारे धरणांची निर्मिती केल्यास शहरांमध्ये येणारे अतिरिक्त पाणी थोपविणे शक्य होणार आहे. महाड शहराची मागील दशकामध्ये झालेली लोकसंख्येची वाढ पाहता या शहराला पाणीपुरवठा करण्याकरता अतिरिक्त सोयी आवश्यक झाल्या आहेत.
महाडचे तत्कालीन नगराध्यक्ष स्व. ॲड. अण्णासाहेब सावंत यांनी यासंदर्भात महाराष्ट्र शासन व लघुपाटबंधारे विभागाशी केलेल्या पत्रव्यवहारानुसार महाड शहरा करता या लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाण्याचा साठा राखीव ठेवण्यात येणार आहे.