

नवी मुंबई : विषारी वातावरणाचा अनुभव शुक्रवारी नवी मुंबईकरांनी घेतला. शहराच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाने पावणे तीनशेचा पल्ला गाठला होता. त्यामुळे दुपारी साडेबारा वाजले तरी शहरावर काळी छाया पसरली होती. हे वातावण नागरिकांच्या आरोग्यास अतिशय घातक असे समजले जाते.
बुधवारी नवी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक शंभरपर्यंत खाली आला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच निवळले होते. पुढील काळात मोकळा श्वास मिळेल असे वाटत असतानाच पुन्हा गुरुवारी एक्यूआय धोकादायक पातळीवर पोहचला.
गुरुवारी रात्री 1 वाजल्यापासूनच नवी मुंबईवर धुरक्याची छाया पसरली होती. त्यामुळे रात्री झोपेत श्वास कोंडल्याचा अनुभव नवी मुंबईकर घेत होते. दुपारी साडेबारा वाजले तरी शहरावरील काळी छाया कायम होती. पहाटे अडीच ते दुपारी साडेबारा दरम्यान नवी मुंबईची हवा अतिधोकादायक (एक्यूआय 250च्यावर) होती. सकाळी आठवाजता तर 273 पर्यंत एक्यूआय पोहचला होता. दुपारनंतर काही प्रमाणात सुधारणा झाली मात्र तरीही एक्यूआय दिवसभर दीडशेच्या वरच राहिला.