रायगड : पनवेल-रोहा रेल्वे मार्गावर पेण तालुक्यातील आमटेम येथे रेल्वे स्थानक उभारण्यात यावे, या 40 वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीसाठी आमटेम रेल्वे स्टेशन निर्माण समिती आता आक्रमक झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कोणत्याही क्षणी रेल रोको करण्याचा इशारा पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
आमटेम व परिसरातील गावांच्या सोयीसाठी या भागात रेल्वे स्थानक असावे, अशी मागणी गेल्या 4 दशकांपासून केली जात आहे. या संदर्भात 17 जानेवारी 2026 रोजी ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलन पुकारले होते. मात्र, तत्पूर्वी 16 जानेवारी रोजी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले होते.
मुंबई येथील मध्य रेल्वे कार्यालयात झालेल्या बैठकीत असिस्टंट डी.आर.एम. तरुण कुमार व मुख्य रेल्वे सुरक्षा अधिकारी ऋषी शुक्ला यांच्या उपस्थितीत चर्चा झाली होती. यावेळी समितीने कि.मी. 121/4 ते 122 या दरम्यानच्या जागेचा पर्याय रेल्वे अधिकाऱ्यांना सुचवला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी या जागेचे सर्वेक्षण करून तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
रेल्वे प्रशासन केवळ आश्वासने देऊन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप आमटेम रेल्वे स्टेशन निर्माण समितीने केला आहे. समितीचे अध्यक्ष बी. के. नाईक, सरपंच लक्ष्मण तांबोळी, यशवंत मोकल, यशवंत ठाकूर आणि तुकाराम गायकर यांच्या स्वाक्षरीने डी.आर.एम. (मध्य रेल्वे) यांना दिलेल्या पत्रात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि समितीच्या या भूमिकेमुळे आता रेल्वे प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमटेम रेल्वे स्टेशन निर्माण समिती व आमटेम ग्रामपंचायत यांनी सुचवलेल्या जागेचे लवकरात लवकर सर्वेक्षण करावे, अन्यथा आम्ही कोणत्याही क्षणी रेल रोको करू आणि हीच आमची अंतिम नोटीस समजावी, असा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे.बी. के. नाईक,अध्यक्ष , आमटेम रेल्वे स्टेशन निर्माण समिती