

मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत लागू होत असलेल्या चार वर्षांच्या पदवी रचनेत विद्यार्थ्यांसाठी ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च या अभ्यासक्रमांचा मार्ग येत्या शैक्षणिक वर्षापासून खुला होणार आहे. मात्र चौथ्या वर्षातील ‘ऑनर्स’ अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक राहील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. वसंत माळी यांनी विचारलेल्या प्रश्नावर कुलगुरुंनी ही माहिती दिली.
कुलगुरूंनी सांगितले की, चौथ्या वर्षात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर ऑनर्स पदवी, पीजी डिप्लोमा किंवा थेट पदव्युत्तर प्रथम वर्षात प्रवेश असे पर्याय उपलब्ध राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच अंतिम निर्णय घ्यावा लागणार नाही; शिक्षणाच्या पुढील टप्प्यांनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळेल. चौथ्या वर्षातील दोन सत्रे पूर्ण करून एकूण 44 क्रेडिट्स मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर तीन पर्याय उपलब्ध राहतील. त्यानुसार विद्यार्थी ऑनर्स पदवी, पीजी डिप्लोमा किंवा थेट पदव्युत्तर शिक्षण सुरू ठेवू शकतो.
विद्यापीठ यूजीसीच्या 2022 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवेश प्रक्रिया राबवणार आहे. ज्या विषयांसाठी यूजीसीची पीएचडी प्रवेश परीक्षा उपलब्ध आहे, त्या विषयांसाठी तीच परीक्षा ग्राह्य धरली जाईल. ज्या विषयांसाठी अशी परीक्षा उपलब्ध नाही, त्या विषयांसाठी विद्यापीठाची पेट परीक्षा घेतली जाईल. पीएचडी प्रवेश गुणवत्ता आणि आरक्षणाच्या नियमांनुसार दिला जाईल. यामध्ये होम युनिव्हर्सिटी किंवा इतर विद्यापीठांसाठी स्वतंत्र कोटा ठेवण्यात येणार नसल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.