आळंदी : पुढारी वृत्तसेवा: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा मंगळवारी (दि.19) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असून, त्यासाठी आळंदीत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी आळंदी शहरात येणार्या वाहनांना रविवारपासून प्रवेश बंदी करण्यात आली, मात्र हा निर्णय घेत असताना स्थानिक वाहनांबाबत नियम व अटी विचारात न घेतल्याने त्याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसला.
सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेले आळंदीकर संध्याकाळी जेव्हा आळंदीत आले तेव्हा त्यांना देहूफाट्यावर प्रवेश बंदीचा सामना करावा लागला. स्थानिक आहोत आधार कार्ड, पॅनकार्डसारखी ओळख पत्रेदेखील दाखवली गेली, मात्र तरीही पोलिसांकडून वाहने सोडण्यात आली नाहीत, यामुळे प्रचंड प्रमाणात संताप स्थानिकांनी व्यक्त केला. पोलिस स्टेशनने दिलेले स्थानिक पास पोलिसांनी दाखवण्याची मागणी केली, मात्र असे कोणते पासच वितरित करण्यात आले नसल्याचे दिसून आले.
शेवटी ग्रामस्थांनी पोलिस स्टेशन गाठल्यानंतर यावर रात्री उशिरापर्यंत मार्ग काढण्याचे काम सुरू होते. एकंदरीतच भविष्यात स्थानिक वाहनांसाठी प्रवेशाचे नियोजन यात्राकाळात करणे गरजेचे बनले आहे. दरम्यान दरवेळीप्रमाणे स्थानिक पातळीवर प्रवेशाचा विषय सोडविता येत असताना वाहने न सोडण्याबाबत आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्याने कठोर भूमिका घेतल्याने विषय वाढल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
यापूर्वी अशा समस्या उद्भवल्या नसल्याने त्यासाठी वेगळे नियोजन केले नाही, मात्र स्थानिक नागरिक असल्याचे ओळखपत्र दाखवून वाहने सोडण्यात यावी, अशा आदेशाची आम्ही वरिष्ठ अधिकार्यांकडे विनंती केली आहे.
– ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आळंदी
हेही वाचा