पुणे: राज्यातील बाजारपेठांमध्ये साखरेचे दर वाढून प्रतिकिलो ५१ ते ५२ रुपये झाले आहेत, तर साखरेची टेंडर्स क्विंटलला ४७०० ते ४८०० रुपये दराने विक्री होत आहेत. साखर कारखान्यांकडे शिलकी साठे कमी असले तरी वाढलेले दर, उपपदार्थांची रक्कम मिळून येणाऱ्या हंगामापूर्वी प्रतिटन ३०० रुपये शेतकऱ्यांना मिळावेत. तशा सूचना साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना देण्याची मागणी संयुक्त चर्चेत केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची शुक्रवारी (दि. ७) सकाळी साखर आयुक्तालयात भेट घेतली आणि विविध मागण्यांवर चर्चा केली. या वेळी संघटनेचे प्रवक्ते ॲड. योगेश पांडे, प्रभाकर बांगर व अन्य शेतकरी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकारने साखर आयातीचा चुकीचा निर्णय घेऊ नये, यासाठी राज्य सरकारने त्यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे.
कारण आयातीचा निर्णय झाल्यास दर घटून उद्योगासह शेतकऱ्यांचेही नुकसान होईल. एआय तंत्रज्ञानाचा वापर उसाचे उत्पादनवाढीसाठी सुरू आहे. तेच तंत्रज्ञान उतारा चोरी आणि उसाची काटामारी रोखण्यासाठीही साखर आयुक्तालयाने करावा. त्यावर येत्या आठवड्यात आयुक्तालयात वजनमापे निरीक्षक व साखर आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत मलाही उपस्थित राहण्यास आयुक्तांनी सांगितले आहे.
सहकारमंत्र्यांनीच थकवली शेतकऱ्यांची एफआरपी
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीची हंगाम २०२४-२५ मधील ९ कोटी २५ लाख रुपयांची एफआरपीची रक्कम अद्याप थकीत ठेवलेली आहे. राज्याचे सहकारमंत्रीच नियम पाळणार नसतील तर कोणावर कारवाई करायची? कुंपणच शेत खात असेल तर न्याय कोणाकडे मागायचा? मग प्रशासन कोणावर कारवाई करणार, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाब विचारला पाहिजे. शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवण्यासाठी त्यांना सहकारमंत्री केलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही त्यांना जाब विचारायला हवा, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
शेट्टी म्हणाले...
इथेनॉलचे २० टक्के मिश्रणाने वाहने चांगली चालतात की नाही यावर आयआयटीसारख्या संस्थेने मत व्यक्त करणे योग्य.
सरकारच्या धोरणाप्रमाणे इथेनॉल उत्पादनात ४५ हजार कोटींची झालेली गुंतवणूक वाऱ्यावर सोडता येणार नाही.
साखर ५० रुपये किलोवर गेल्यामुळे आता इथेनॉल खरेदीचे दर वाढले पाहिजेत.
राज्य सरकारने शेतकऱ्यांची तत्काळ कर्जमाफी करून कर्ज नसल्याचे दाखलेवाटप समारंभपूर्वक करावेत.
सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रश्न सोडवण्यासाठी तरुणाईचा वापर करत असतील तर ते चांगले आहे. त्यातून जनतेला न्याय मिळत असेल तर मी त्यांच्या गोष्टींचे स्वागत करतो.
तुकाराम मुंढे यांचे अभिनंदन. भेसळखोरांवरील कारवाईमुळे प्रामणिक दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळण्यास मदत होत आहे.