मांडवगण फराटा: शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसूटी येथे बुधवारी (दि. २२) पहाटे सुमारे पावणेतीनच्या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (रा. सध्या पिंपळसूटी, मूळ गाव पाथर्डी, जि. अहिल्यानगर) ही आपल्या कुटुंबासह पिंपळसूटी येथील शेतकरी मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या येथे ऊस तोड करण्यासाठी वास्तव्यास होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास आई-वडील व मुलगी बाहेर गोठ्यामध्ये झोपले होते. अचानक बिबट्याने मुलीवर हल्ला केला. मुलगी मोठ्याने ओरडली. नंतर आई-वडील जागे झाले, परंतु बिबट्याने तोपर्यंत त्या मुलीला ऊसाच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर स्थानिकांनी भाग्यश्रीचा शोध घेतला असता काही वेळाने तिचा मृतदेह शेतात आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (रा. सध्या पिंपळसूटी, मूळ गाव पाथर्डी, जि. अहिल्यानगर) ही आपल्या कुटुंबासह पिंपळसूटी येथील शेतकरी मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या येथे ऊस तोड करण्यासाठी वास्तव्यास होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास आई-वडील व मुलगी बाहेर गोठ्यामध्ये झोपले होते. अचानक बिबट्याने मुलीवर हल्ला केला. मुलगी मोठ्याने ओरडली. नंतर आई-वडील जागे झाले, परंतु बिबट्याने तोपर्यंत त्या मुलीला ऊसाच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर स्थानिकांनी भाग्यश्रीचा शोध घेतला असता काही वेळाने तिचा मृतदेह शेतात आढळून आला.
या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच भाग्यश्रीचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
पिंपळसूटी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना असून, शिरूरच्या पूर्व भागातील बिबट्याच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, मुलांना शाळेत पाठवावे की नाही, अशी चिंता पालक व्यक्त करत आहेत. बिबट्याचे भक्ष्यस्थानी चिमुकली मुले व वयोवृद्ध सापडली असून वनविभाग अजूनही ठोस उपाययोजना कुठेच करत नाही.
या परिसरात अजूनही अनेक बिबटे मुक्तपणे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार घटना घडूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील पंचनामा व आवश्यक कार्यवाही सुरू केली.