पुणे: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. 9 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत शाळानोंदणी व व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग््राजी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावे, यासाठी ऑनलाइन पद्धतीने आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवली जाते.
त्यानुसार 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने 9 जानेवारीपासून विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळानोंदणी आणि शाळा व्हेरिफिकेशनची लिंक सुरू केली आहे. शाळानोंदणीनंतरचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशनचा असतो.
तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना बंद केलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरित झालेल्या शाळा आरटीई 25 टक्के प्रवेश सन 2026-27 मध्ये प्रवीष्ट होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात येईल.
तसेच शाळामान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का, याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळामान्यता राज्य मंडळाची आहे व नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे.) 9 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 दरम्यान शाळानोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक गोसावी यांनी दिल्या आहेत.