कोंढवा: महंमदवाडी परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, उखडलेले डांबरीकरण आणि चिखलामुळे वाहनचालक आणि नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. तसेच दररोजच वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांना पायी चालणेही अवघड झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. परिणामी, दुचाकीस्वारांचे अपघात वाढले असून, अनेकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटना घडत आहेत.
महंमदवाडी परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर निवासी प्रकल्प उभे राहिले असून लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. मात्र, त्यानुसार रस्ते आणि इतर नागरी सुविधांचा विकास झालेला नाही. वाढत्या वाहनसंख्येमुळे अरुंद व खराब रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. याबाबत वेळोवळी संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचे परिसरातल नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शास्त्रीनगर चौकात खड्ड्यांमुळे अपघात
कल्याणीनगरहून येरवड्याच्या दिशेने जाणाऱ्या शास्त्रीनगर चौकातील वळणावर मोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातही होत आहे. मात्र याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
सततच्या पावसामुळे शास्त्रीनगर चौकातील वळणावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना ते दिसत नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघातही होत आहेत. या रस्त्यावर दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. महापालिका प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशीम मागणी नागरिकांनी केली आहे.
येरवडा वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव म्हणाल्या, 'शास्त्रीनगर परिसरातील खड्डा बुजविण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. मात्र अद्याप खड्डा बुजवण्यात आलेला नाही. अपघाताचे प्रमाण वाढल्याने, तसेच वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून शास्त्रीनगर चौक परिसरात बॅरिगेट लावण्यात आले आहेत.'
याबाबत येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील पथ विभागाचे अधिकारी वसंत नागरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
महंमदवाडी परिसरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी
खड्डे बुजविण्याचे काम दर्जेदार आणि कायमस्वरूपी करण्याव यावे
रस्त्यांवरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करा
रस्त्यांच्या कामाचा दर्जा तपासून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी