पुणे: चार वर्षांच्या प्रेमातून फुललेले नातेः घरच्यांचा विरोध झुगारून वयाने पाच वर्षे लहान असलेल्या तरुणासोबत लग्नाचा घेतलेला धाडसी निर्णयः सुखी संसाराची स्वप्ने डोळ्यांत साठवून उभा केलेला संसार. पण, वास्तव समोर येताच स्वप्नांचा चुराडा झाला. पतीची नाजूक आर्थिक परिस्थिती उघड होताच अवघ्या महिन्यातच संसार कोलमडला. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा थेट न्यायालयातच उभी राहिली आणि समुपदेशनानंतरही दुरावा न मिटल्याने अखेर या प्रेमकथेचा शेवट घटस्फोटात झाला.
स्मिता (वय 30) आणि राकेश (वय 25) (नावे बदललेली) यांची ओळख प्रेमात बदलली आणि चार वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी आळंदीत कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला. दोघांनीही नव्या आयुष्याची सुरुवात मोठ्या आशेने केली होती. परंतु, लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच पत्नीला पतीची आर्थिक परिस्थिती अपेक्षेपेक्षा वेगळी असल्याचे जाणवले. ही जाणीव नात्यात दरी निर्माण करणारी ठरली. ती माहेरी परतली आणि त्यानंतर पुन्हा सासरी न जाण्याचा निर्णय घेतला. पतीने अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. परत येण्याची विनंतीही केली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
शेवटी, नात्यातील तणाव वाढत गेल्याने पतीने मार्च 2025 मध्ये ॲड. शुभांगी टेमगिरे यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, या प्रक्रियेनंतर तब्बल एक वर्षाने पत्नी न्यायालयात हजर झाली आणि तिने पोटगीसाठी अर्ज केला.
न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दोघांचेही वकील आणि समुपदेशकांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पतीची मर्यादित आर्थिक परिस्थिती आणि पत्नीचे पुढील आयुष्य या दोन्ही गोष्टींचा सखोल विचार झाला. अखेर, वादाच्या जागी संवादाने मार्ग काढला. पत्नीने लग्नावेळी झालेल्या खर्चापोटी 30 हजार रुपये आणि कपडे परत करण्याची मागणी केली. इतर कोणतीही आर्थिक देवघेव न करण्याचे दोघांनी मान्य केले आणि अखेर एकतर्फी वाटणारा हा वाद परस्पर संमतीच्या घटस्फोटात बदलला.
समुपदेशनाच्या प्रक्रियेत संवाद साधला गेला आणि दोघांनाही वास्तव परिस्थितीची जाणीव झाली. न्यायालयाचा उद्देश केवळ वाद सोडवणे नसून, दोन्ही पक्षांसाठी न्याय्य आणि व्यवहार्य तोडगा काढणे हा असतो. परस्पर संमतीने घेतलेला निर्णय हा भविष्यासाठी अधिक स्थिर आणि योग्य ठरतो.ॲड. शुभांगी टेमगिरे