ओतूर, पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे जिल्ह्याला जोडणारा नजिकचा असणाऱ्या बदगीच्या घाटात जांभळे येथील कार (एमएच १६ बीएच. ६०२०) ही गाडी कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन मालक नवनाथ तुकाराम हुलवळे (रा. जांभळे, ता. अकोले) हे जागीच ठार झाले तर राहुल खंडू हुलवळे (वय ४०, रा. जांभळे, ता. अकोले) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
ही घटना रविवारी (दि. १३) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. बदगीच्या घाटाचा मार्ग अतिशय अरुंद असून येथे मोठ्या प्रमाणात वळणावर चढण रस्ता आहे. या ठिकाणी उंचीवरून काहीतरी कोसळले असल्याचे दृश्य येथील दैनंदिन फिरायला जाणारे भरत डुंबरे आणि इतर सहकारी यांनी बघितले.सामाजिक कार्यकर्ते विकास चव्हाण यांनी ओतूर पोलीस ठाण्याशी संपर्क केला.
लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचले. खामुंडी येथील युवकांना या घटनेची माहिती मिळाल्यावर बदगी आणि खामुंडी येथील ग्रामस्थांनी सुमारे अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून शोधकार्य केले. अखेर नवनाथ तुकाराम हुलवळे यांचा मृतदेह आढळला. ओतूर पोलिसांनी खामुंडी ग्रामस्थांच्या मदतीने झोळी करून मृतदेह बाहेर काढला व जखमी राहुल हुलवळे यांस आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताबाबत ओतूरचे सहायक पो. नि. परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.