मंचर: वाढते तापमान तसेच उन्हाळी आवर्तनामुळे आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सध्या धरणात 20.81 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, गतवर्षी याच कालावधीत 10.98 टक्के पाणीसाठा होता. यंदा तुलनेने पाणीसाठा अधिक असला तरी वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
उन्हाची तीवता दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक भागांतील शेतकरी खरीपपूर्व पिके तसेच भाजीपाला टिकवण्यासाठी धडपड करीत आहेत. पाण्याअभावी जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, डाव्या कालव्यास सुमारे सहाशे क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतीला दिलासा मिळत असला तरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे कुकडी प्रकल्पाचे अधिकारी दत्ता कोकणे यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर वाढवून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पावसाळा लांबल्यास पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असून, वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून ठिबक सिंचनास प्राधान्य द्यावे.गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प