पुणे: महाराष्ट्रात 2025-26 या वर्षात 971 मातामृत्यूची नोंद झाली. मागील काही वर्षांच्या तुलनेत मातामृत्यूची संख्या कमी झाली असली, तरी 971 मृत्यू ही कमी संख्या नाही, असे मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक मातामृत्यू म्हणजे एका कुटुंबावर कोसळलेले संकट आहे. त्यामुळे 971 हा फक्त आकडा नसून राज्यासाठी इशारा आहे, असे तज्ज्ञांनी नमूद केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2024-25 मध्ये 1106, तर 2023-24 मध्ये 1131 मातामृत्यू झाले होते. यंदा त्यात काही प्रमाणात घट झाली असली तरी दररोज सरासरी दोन ते तीन महिलांचा प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर मृत्यू होत असल्याची वस्तुस्थिती चिंताजनक मानली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, मातामृत्यूमागील प्रमुख कारणांमध्ये अतिरक्तस्राव, गर्भधारणेदरम्यानचा उच्च रक्तदाब, संसर्ग, रक्ताल्पता, हृदयरोग आणि उपचारात होणारा विलंब, यांचा समावेश आहे. विशेषतः उच्च जोखमीच्या गर्भधारणांची वेळेत ओळख न होणे आणि रुग्णांना तातडीने सक्षम रुग्णालयात हलविण्यात होणारा विलंब अनेक महिलांसाठी जीवघेणा ठरत आहे.
आरोग्यव्यवस्थेतील ताण आणि असमानता उघड
आरोग्य विभागाकडून जननी सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृवंदना योजना आणि प्रसूतीपूर्व तपासणी मोहिमा राबविल्या जात असल्या, तरी शहरी भागातील महापालिका क्षेत्रांमध्येच 700 हून अधिक मातामृत्यू झाल्याने आरोग्यव्यवस्थेतील ताण आणि असमानता अधोरेखित होत आहे.
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मातामृत्यू कमी करण्यासाठी केवळ योजना पुरेशा नाहीत; प्रशिक्षित मनुष्यबळ, रक्तपेढ्या, अतिदक्षता सुविधा, पोषण आणि वेळेवर उपचार यांची साखळी मजबूत करणे अत्यावश्यक आहे.
मातामृत्यूमागील कारणे
गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब
प्री-एक्लेम्पसिया आणि एक्लेम्पसियामुळे आईला झटके येणे, मेंदू किंवा इतर अवयवांवर परिणाम होणे.
अतिरक्तस्राव, विशेषतः प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर होणारा जास्त रक्तस्राव हा मातामृत्यूचे सर्वांत मोठे कारण मानले जाते.
प्रसूतीपूर्व किंवा प्रसूतीनंतर झालेला गंभीर संसर्ग वेळेत नियंत्रणात न आल्यास जीवघेणा ठरतो.
रक्ताची गाठ फुप्फुसात अडकणे. ही स्थिती अचानक आणि अतिशय धोकादायक असते.
हृदयरोग:
आधीपासून असलेले किंवा गर्भधारणेमुळे वाढलेले हृदयाचे विकार.
हिमोग्लोबिन कमी असल्याने प्रसूतीतील गुंतागुंत वाढते आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.
उच्च जोखमीची गर्भधारणा वेळेत न ओळखणे.
योग्य वेळी उपचार न मिळणे, रेफरलमध्ये उशीर होणे किंवा सुसज्ज रुग्णवाहिका नसणे.
ग््राामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुविधांतील तफावत.