पुणे: राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप केलेले नाही. त्यामुळे अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दहावीचे गुणपत्रक आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याची सक्ती न करता हमीपत्राच्या आधारे प्रवेश द्यावा, असे स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.
डॉ. पालकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, सन 2026-27 मधील इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. दि. 21 मेपासून प्रवेश प्रकियेतील पहिल्या नियमित फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीतील प्रवेश गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि. 29) जाहीर करण्यात आली, तर येत्या 3 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार आहे.
दहावीचा निकाल राज्य मंडळाने ऑनलाईन जाहीर केला असून, अद्याप मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.
अशा विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणपत्रक अनिवार्य करण्यात येऊ नये. तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला शाळेकडून प्राप्त झाल्यानंतर सादर करण्यात येईल, असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून घ्यावे.
डिजिलॉकरद्वारे प्रमाणपत्र उपलब्ध
राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेबु्रवारी-मार्च 2026च्या दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र अपार आयडीशी संलग्न स्वरूपात डिजिलॉकरवर उपलब्ध करून दिलेली आहेत. डिजिलॉकर प्रणालीवर परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र, बैठक क्रमांक नमूद करून विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे. तसेच संबंधित डिजिटल गुणपत्रक तथा प्रमाणपत्र मंडळाच्या ई-मार्कशीट पोर्टलवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.