खडकवासला: ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसंपन्नता लाभलेल्या हवेली तालुक्यातील डोंगररांगा सध्या विकसकांच्या विळख्यात सापडल्या आहेत. जांभळी, सोनापूर, आंबी, घेरासिंहगड आणि खामगाव परिसरात फार्म हाऊस आणि गुंतवणुकीच्या नावाखाली डोंगरांची अक्षरशः लचकेतोड सुरू असून, पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून जेसीबीच्या साहाय्याने डोंगर पोखरण्याचे काम जोमात सुरू आहे.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये डोंगरांवरील नैसर्गिक उतार कापून जमीन सपाट केली जात आहे. नियमानुसार डोंगराचा उतार कापण्यास बंदी असतानाही बेकायदा उत्खनन करून निसर्गसंपत्ती नष्ट केली जात आहे. पुणे रिंगरोडच्या कामात आधीच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असताना आता खासगी प्लॉटिंगमुळे उरलीसुरली वनसंपदाही संपुष्टात येत आहे. या भागात आढळणाऱ्या दुर्मीळ वनौषधी आणि स्थानिक वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे बिबट्या, भेकर, मोर आणि ससा यांसारखे वन्यजीव आता मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. यामुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पूरस्थिती उद्भवण्याचा धोका
प्लॉटिंगच्या हव्यासापोटी डोंगरावरून पावसाचे पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले बुजविण्यात आले आहेत. ओढ्यांचे प्रवाह बदलल्यामुळे पावसाळ्यात या भागात पूरस्थिती उद्भवण्याचा आणि दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यालगतच संरक्षक भिंती बांधून नैसर्गिक पाण्याचे मार्ग रोखण्यात आले आहेत.
नावापुरतीच दंडात्मक कारवाई
डोंगर पोखरण्याचे काम उघडपणे सुरू असतानाही महसूल आणि वन विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. काही ठिकाणी नावापुरती दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, मूळ डोंगर पुन्हा पूर्ववत होऊ शकत नाही. जर वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर या भागाचे सौंदर्य केवळ फोटोंपुरतेच मर्यादित राहील, अशी खंत व्यक्त होत आहे.
नियमबाह्य डोंगरफोड सुरू असलेल्या ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आणि अनधिकृत उत्खनन करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.डॉ. अर्चना निकम, तहसीलदार, हवेली