खडकवासला: जिल्ह्यातील शेतीसह पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा चिंताजनक घट झाली आहे. त्यातच अल निनोच्या प्रभावाने पाऊस लांबणीवर पडला आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह पुणे शहरातील नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत मिळून केवळ ४.३१ टीएमसी (१४.८० टक्के) इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५.२० टीएमसी (१७.८४ टक्के) इतका होता. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण साखळीत जवळपास एक टीएमसीने कमी पाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते, एल निनो च्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचेच परिणाम धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिसून येत आहेत. परिसात अद्याप मोठा पाऊस न झाल्याने धरणांमध्ये नवीन आवक वाढलेली नाही.
पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होऊन धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यासच परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अन्यथा मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाणीसाठा आणि अपुरी आवक यामुळे पुणे जिल्ह्यावर संभाव्य पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
दुष्काळात अतिक्रमणांचा ताण
विशेष म्हणजे खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर शहरीकरण, पर्यटन व्यवसाय, फार्महाऊस आणि बांधकामे वाढली आहेत. त्यातच कमी पाऊस, वाढती पाण्याची मागणी आणि एल निनोचा प्रभाव यामुळे जलसाठ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.