नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी, जाधववाडी परिसरात अनेक वर्षांपासून गावठी दारूनिर्मितीचा व्यवसाय सुरू आहे. या परिसरात संबंधित यंत्रणांकडून वारंवार कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, काही दिवसांतच पुन्हा दारूभट्ट्या पुन्हा सुरू होतात. परिणामी येथील अवैध दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
संबंधित अधिकारी सांगतात की, दर आठवड्याला आम्ही कारवाई करतो. परंतु, पुन्हा या भट्ट्या सुरू होत आहे, तथापि आता कायमस्वरूपी या भट्ट्या बंद केल्या जाणार असल्याची माहिती दारू उत्पादन शुल्क विभागाचे नारायणगाव येथील निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले.
धनगरवाडी परिसरातील ओढ्याच्या कडेला अथवा उसात गावठी दारूनिर्मिती केली जाते. बोरीच्या जाधववाडी परिसरात गावठी दारूभट्ट्या सुरू आहेत. गावठी दारूनिर्मितीसाठी गूळ, नवसागर तसेच इतर रासायनिक पदार्थांचे मिश्रण वापरले जात असल्याची माहिती समोर येत असते. यामुळे मद्यपींच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.
या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिस प्रशासनाकडून छापे टाकून दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात येतात. मात्र, काही दिवसांतच त्याच परिसरात पुन्हा दारूभट्ट्या सुरू होतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. धनगरवाडी व बोरी परिसरातील दारूभट्ट्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी संंबंधित प्रशासनाने सातत्याने देखरेख ठेवावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
धनगरवाडी व बोरीच्या जाधववाडी परिसरातील दारूभट्ट्यांवर दर आठ दिवसांनी कारवाई करत असतो. दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन ओतून देऊन इतर साहित्य जप्त करत असतो. मात्र, काही दिवसांनंतर या दारूच्या भट्या पुन्हा सुरू होतात. आता मात्र एकत्रित कठोर कारवाई करून या दारूभट्ट्या कायमच्याच बंद होण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत.सुनील गायकवाड, निरीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, नारायणगाव