पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी 3 नंतर प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते. या प्रमाणपत्रांचे वाटप करताना त्यावर प्राचार्यांची सही आणि शिक्का आवश्यक होता. परंतु, काही कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्राचार्यांची सही आणि शिक्का नसलेल्या प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचे उघडकीस आले आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांतर्फे फेबुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 2 मे रोजी ऑनलाइन जाहीर केला होता.
त्यानंतर 25 मे रोजी गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि तपशीलवार गुण दर्शिवणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत महाविद्यालयांना सकाळी 11 वाजता करण्यात आले. त्यानंतर दुपारी 3 पासून महाविद्यालयात संबंधित प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
परंतु, सकाळी 11 ते दुपारी 3 यादरम्यान वेळ फारच कमी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्राचार्यांची सही आणि शिक्का नसलेल्या प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे काही महाविद्यालयांतील शिक्षकांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यांची ओरिजनल प्रत मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा पदवी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राचार्यांची सही व शिक्का आवश्यक
राज्य मंडळाने यंदा बारावीसाठी एकच प्रमाणपत्र तयार केले आहे. अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्य असलेले हे प्रमाणपत्र आगळेवेगळे आहे. परंतु, त्यावर प्राचार्यांची सही आणि शिक्का गरजेचा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर सही आणि शिक्का नसेल त्यांनी प्रमाणपत्र तपासून त्यावर प्राचार्यांची सही आणि शिक्का घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.