Harshvardhan Sapkal Pudhari
पुणे

Harshvardhan Sapkal: "सत्ताधाऱ्यांना रावणापेक्षाही जास्त अहंकार!" नगरपालिका निवडणुकीत 'पैसा फेक, तमाशा देख' वगनाट्य रंगले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची खरमरीत टीका

भाजप-महायुतीने आचारसंहितेचा सर्रास भंग केला; निवडणूक आयोग सरकारच्या हातची कठपुतली, लोकशाहीसाठी अत्यंत घातक: हर्षवर्धन सपकाळ.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यभरात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रासपणे भंग केला आहे. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या केवळ 25 नाही तर 25 हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हे माहिती नाही.

मात्र, हा गंभीर प्रश्न आहे. आजच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांचे ‌‘पैसा फेक तमाशा देख‌’ हे वगनाट्य रंगले आहे. भाजप व त्यांचे नेते महापुरुष, देवदेवतांपेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजत आहेत. सत्ताधाऱ्यांना रावणापेक्षा जास्त अहंकार चढला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

काँग्रेसतर्फे शहरात आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाच्या उद्घाटनापूर्वी सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सपकाळ म्हणाले, आज झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट झाला होता. दादागिरी, दडपशाही करण्यात आली. बोगस मतदार दिसून आले. भाजप, शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांनी आचार संहितेचे सर्व नियम पायदळी तुडवले. लोकशाही व संविधानाची पायमल्ली केली. या सत्ताधारी महायुतीने गाव तिथे बारा भानगडी करून ठेवल्या आहेत.

या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पंजा या चिन्हावर 165 नगराध्यक्षपदांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली होती. प्रचारासाठीही काँग्रेस नेत्यांनी विविध भागांमध्ये प्रचार सभा घेतल्या आहेत. मी स्वतः राज्यभर 65 प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीत नव्हती, या आरोपात काहीही तथ्य नाही. काँग्रेससह विरोधी पक्षांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक विजयी झाले तरी पुन्हा फोडाफोडीचा प्रकार सत्ताधारी करणार नाहीत हे कशावरून. मात्र, खरा प्रश्न हा आपली लोकशाही कोणत्या दिशेने जात आहे हा असून हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सपकाळ काय म्हणाले?

निवडणूक आयोग सरकारच्या हातची कठपुतली झाला. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे.

मतदान तसेच मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने आयोगाच्या कामाचे वाभाडे निघाले आहेत.

निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय गोंधळ, मतांची धांदल

निवडणुकीत पैशांमार्फत सर्वांवर दबाव आणण्याचा भाजपाचा प्रयत्न

काँग्रेस हा विचार कोणाच्याही जाण्याने तो संपणार नाही.

आमदार बांगर यांचेविरोधात दाखल होत असलेले गुन्हे ते पदक मिळाल्यासारखे वावरतात.

देश काँग्रेसमुक्त नव्हे भाजप हा काँग्रेसयुक्त झाली आहे.

‌‘देशाचा वारसा समजून घ्या‌’

पुणे : प्रामाणिकपणा हा आपल्या देशाचा मूळ स्वभाव असून तो सध्या आपण विसरत चाललो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे काम समाजात बुद्धिभेद निर्माण करणे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे आहे. आपला स्वाभिमान आपली भाषा, धर्म, लिंग यात नाही तर इतिहासात आणि कर्तृत्ववात आहे. आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपण समजून घेतला पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार मोहन जोशी यांच्यातर्फे आयोजित 21 व्या ‌‘सेवा-कर्तव्य-त्याग‌’ सप्ताहाचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आयोजक मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, श्रीरंग चव्हाण, सौरभ अमराळे, लता राजगुरू उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT