पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने 405 एकर जमिनीचे संपादन केले आहे. मोबदल्यापोटी तब्बल 830 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून 172 किलोमीटर आणि 110 मीटर रुंदीचा रिंगरोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम, असे दोन भाग करण्यात आले. पूर्व मार्गावरील मावळ तालुक्यातून 11, खेड 12, हवेली 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांतून प्रस्तावित आहे; तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील 5, हवेली 11, मुळशी 15 आणि मावळ तालुक्यातून 6 गावे बाधित होणार आहेत. संपूर्ण प्रकल्पासाठी 26 हजार 800 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम मार्गावरील 32 गावांचे, तर पूर्वेकडील चार गावांचे फेरमूल्यांकनानुसार दर निश्चित झाले आहेत. त्यानुसार 2 हजार 581 स्थानिक बाधित होत आहेत. सर्व बाधितांना भूसंपादनाच्या नोटीस बजाविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
राज्य शासनाच्या सुचनेनुसार पश्चिम आणि पूर्व भागातील बाधित गावांचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. पश्चिम भागातील बाधित होणार्या मावळ, मुळशी, भोर आणि हवेली या तालुक्यांतील 32 गावांतील 697 हेक्टर क्षेत्रातील 2404 स्थानिक बाधित होणार आहेत; तर पूर्वेकडील भोर तालुक्यातील चार गावांतील 105 हेक्टर क्षेत्रातील 177 स्थानिक बाधित होत आहेत. आतापर्यंत 405 एकर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. आणखी 50 एकर जमिनीचे संपादन करण्यात येईल. तसेच भूसंपादनापोटी आतापर्यंत संबंधित शेतकर्यांना 830 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, तर पुढील दोन दिवसांत 75 कोटी रुपयांचे वाटप
करण्यात येईल.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार नवीन नियमावलीप्रमाणे दर निश्चित करण्यात आल्याने त्याचा प्रकल्पग्रस्तांना फायदा होत आहे. सुधारित नियमाप्रमाणे थेट लाभ हस्तांतर करून भूसंपादन करण्यात येत आहे. त्याआधी बाधितांमधील समस्या, लाभाचे हस्तांतरण, हस्तांतरित रकमेचा विनियोग आणि सुरक्षिततेबाबत बाधितांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
हेही वाचा :