निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केली असतानाही एक अविकसित भाग तसेच एक आदिवासी ग्रामीण भाग म्हणून पालघर जिल्ह्याची ओळख होती. वास्तविक पाहता काश्मिर उटीच्या तसेच केरळ आसामच्या तोडीस तोड ठरणारी ही पर्यटन स्थळांची भूमी. मात्र, त्यांना आवश्यक तेवढी प्रसिद्धी न मिळाल्याने ती सौंदर्याने परिपूर्ण असतानाही दुर्लक्षित राहिली होती. मात्र, काळाच्या ओघात ही परिस्थिती बदलली. ठाण्यापासून अलग पालघर जिल्ह्याची नवनिर्मिती झाली. कोकणातील पर्यटनस्थळांचा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची नवी ओळख निर्माण झाली. पालघरमधील पर्यटन स्थळे खऱ्या अर्थाने जगाच्या नकाशावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
दाभोसा आणि दादरकोपरा धबधबा, शिर्पामाळ, जयविलास राजवाडा, हनुमान पॉइण्ट, सनसेट पॉइण्ट, शिरगाव, गारेश्वर मंदिर वसई, जीवदानी मंदिर, डहाणूचा किल्ला, तारापूरचा किल्ला, शिरगाव किल्ला, केळवे माहीम, अर्नाळा, वसईचा किल्ला, डहाणू-बोर्डी बीच व महालक्ष्मी ही पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटक पाहुण्यांना खुणावतातच.
नवीद शेख
पालघर जिल्ह्याला लाभलेली किनारपट्टी, विविध बिच यामुळे पर्यटक पाहुण्यांना हे सागरकिनारे खुणावू लागले आहेत. आदरातिथ्याची परंपरा व कोकणचा निसर्गरम्य परिसर यामुळे मुंबईत येणारा पर्यटक हा पालघरमधील पर्यटन स्थळांनाही पसंती देतोच देतो. सागरी सौंदर्याची निर्मिती हा जणू ईश्वराचा प्रांत. आपले शब्द तिथे फिकेच पडतात. अशावेळी सागराच्या या पाण्यातून ओंजळ भरावी आणि ती सागरालाच अर्पण करावी, तसं आपण या सृष्टी सौंदर्याच्या वर्णनासाठी आधार घेतो. अशावेळी नव्या सोनेरी फेसाळ सौंदर्याचा मोह मात्र, आपल्याला कांचन मृगाप्रमाणे भूलवल्याशिवाय राहत नाही एवढंच खरं. सौंदर्याच्या अनेक छटा आहेत. शरीर सौंदर्य जसं मनाला मोहोरतं, अगदी तसंच भ्ााव सौंदर्य देखील मनाला भुरळ घालतं. सृष्टी सौंदर्याची बातच न्यारी. आजच्या धकाधकीच्या जीवनात या सौंदर्याची संवेदनाच आपण हरवून बसलो आहोत, असं म्हटलं तर वावगे ठरू नये. मात्र, आपणा सगळ्यांच्याच बाबतीत असं घडतंच असं नाही. एखादा हे सौंदर्य भरभरून पाहतो आणि ते सौंदर्य शब्दांत पकडण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. तर दुसरा नादावलेला गडी त्याला तालासुरात गुंफत जातो आणि केवळ दृष्टीला भावलेल्या या सागरी सौंदर्याची नितळता मनात साठवतोच. पालघ्ार जिल्ह्याला सागर किनारपट्टीवर फेरफटका मारताना अगर तेथील
निरव शांततेत वेळ घालवताना सागर तीरावर येणाऱ्या लाटांनी गायलेली आरसपाणी गीतं कानातून मनात अलगद मिसळतात आणि त्याची सौंदर्य गीतं बनतात, अशा पालघरमधील किनाऱ्यावरील सागरी सौंदर्यावर लिहावं तेवढं थोडंच आहे. डहाणू-बोर्डी बीच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात स्थित आहे.
तो 17 कि.मी. अंतरावर पसरलेला आहे. तसेच त्याच्या व्यापक आणि नीटनेटका किनाऱ्यासाठी व अफाट चीकू फळे व गुलाबसाठीही प्रसिद्ध आहे. जरी येथे उन्हाळ्यात जोरदार उब असते, पण सभ्य वाऱ्याची झुळूक संपूर्ण समुद्रकाठाला गार करते. पालघर जिल्ह्याकडे पर्यटनाचा एक नवीन पर्याय म्हणून बघितले जात आहे. या शहराला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले असून पर्वत रांगा, धबधबे, तलाव, पुरातन वास्तुकला, नयनरम्य सनसेट पॉइण्टस, येथील आदिवासी बांधवांच्या परंपरा, संस्कृती, सण याची देणगीच जणू लाभली आहे.
शिरगाव : शांत-निवांत सागरतीर, किनाऱ्यावरच शतकानुशतकांचा इतिहास सांगणारा दुर्ग आणि हिरव्यागार परिसराच्या कोंदणात वसलेलं शिरगाव हे मुंबई-ठाणेकरांसाठी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्याला शांतनिवांत सागरतीर लाभला आहे. शिरगावचा किल्ला हा किनारी दुर्ग प्रकारातला असून तो पालघरच्या पश्चिमेला आहे. पालघरपासून 7 ते 8 कि.मी. अंतरावर शिरगावचा किल्ला आहे. शिरगावचा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला प्रथम पालघरला पोहोचणं आवश्यक आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या शिरगावच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांनी इतर किल्ल्यांबरोबर हल्ला चढवला होता. पण, तो त्यावेळी ताब्यात घेता आला नाही. पुढे चिमाजी आप्पांनी उत्तर कोकणाच्या मोहिमेत शिरगावचा किल्ला ताब्यात घेतला. गावाच्या मधोमधच किल्ला आहे. पोर्तुगीजकालीन वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आणि मनोऱ्यामुळे किल्ला प्रथमदर्शनातच आकर्षून घेतो. पहिला दरवाजा पुर्वाभिमुख असून त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. दोन्ही दरवाजांच्यामध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामधील पडझड झालेल्या वास्तू दिसतात. किल्ल्याचा आकार फारसा मोठा नसल्याने गडफेरीला फार वेळ लागत नाही. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. या पायऱ्यांवरून तटबंदीवर पोहोचल्यावर प्रवेशद्वाराच्या वर बांधलेल्या घुमटाकृती मनोऱ्यावर जाता येते. तटबंदीवरून किल्ल्याला फेरी मारता येते. पूर्वेकडील आयताकृती मनोऱ्यावरून शिरगावचं मनोवेधक दृष्य दिसतं. गडाचा आकार छोटा असल्याने बांधकामं आटोपशीर आणि कमी जागेत बसवलेली आढळून येतात. पश्चिमेकडील बुरूजावरून अथांग सागराचे रमणीय दृश्य दिसते. या बाजूच्या तटबंदीमधे एक चोर
दरवाजाही आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या ताडवृक्ष आणि त्यांच्या फांद्या सुंदर दिसतात. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर येथून पालघरला रस्ता जातो. पालघर रेल्वे स्थानकही आहे. शटल-मेल, लोकलने पालघरला जाता येते. तिथून शिरगावला जाण्यासाठी एस.टी.ची सोय आहे. एस.टी. थांब्यापासून लगेच किल्ल्याजवळ पोहचू शकतो.
दाभोसा व दादरकोपरा धबधबा : जव्हारपासून 18 कि. मी. वर तलासरी-सिल्व्हासा रोडवर हे सुंदर धबधबे आहेत. लेंडी नदीपासून वाहणारे पाणी डोगरांच्या दोन्ही बाजूने धबधब्याच्या रूपात खाली येते. दाभोसा हा मुख्य धबधबा असून उंची 300 फूट इतकी आहे. दादरकोपरा धबधबा हा उन्हाळ्यात कोरडा असतो म्हणून त्याला सुका धबधबा असेही म्हणतात. दोन्ही धबधबे हे सुमारे 600 फूट उंच डोंगरांनी वेढलेले आहेत. या भागात अनेक वनऔषधी वनस्पती आढळून येतात. फेब्रुवारी ते जुलै ही या धबधब्यास भेट देण्यासाठी आदर्श वेळ आहे.
शिर्पामाळ : 3 शतकांपेक्षा ही जुने असे हे शिल्प शिवरायांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. डोंगराच्या कडेवर असल्यामुळे शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी या भागाचा वापर केला जात असे. या भागातून संपूर्ण जव्हार शहरावर दृष्टीक्षेप टाकता येतो. सुरतच्या दिशेने कूच करताना शिवरायांनी याच भागात थांबून विश्रांती घेतली होती. जव्हारचे त्यावेळचे राजे पहिले विमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन जव्हारमध्ये स्वागत केले तेच हे ऐतिहासिक स्थळ. हिरव्यागार टेकडीवर फडकणाऱ्या भगव्याचे दृष्य अत्यंत सुंदर दिसते. जव्हारमध्ये अजून बरीच पर्यटन स्थळे आहेत, ज्यामध्ये दक्षिणमुखी मारुती मंदिर, वर्षभर सतत वाहणारा काळ मांडवी धबधबा, सुंदर आणि शांत खदखद तलाव, शिवरायांनी बांधलेला भोपाटगड किल्ला यांचा समावेश होतो.
जयविलास राजवाडा : जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे. आदिवासी संस्कृती दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक फिल्म शूट्ससाठी केला गेला आहे. सकाळी 10 ते सायं. 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा पाहण्यास खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासमाफक प्रवेश फी आकारली जाते.
हनुमान पॉइण्ट: शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 1 कि. मी. अंतरावर एक हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉइण्टला हनुमान पॉइण्ट असे म्हणतात. तिन्ही बाजूने वेढलेली खोल दरी, दाट जंगले, जवळच्या राजविलास राजवाड्याची प्राचीन घुमटे, दूरवर दिसणारा ऐतिहासिक शहापूर माहोलीचा किल्ला आणि मोकळे आकाश असे नयनरम्य दृष्य येथून दृष्टीस पडते. रात्रीच्यावेळी येथून दिसणारा, कसाऱ्याच्या घाटातून जाणऱ्या ट्रेनचा प्रकाश एक वेगळाच अनुभव देऊन जातो.
सनसेट पॉइण्ट: जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉइण्ट म्हणजेच सनसेट पॉइण्ट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमीवर हा पॉइण्ट आहे. जोडप्यांचा लाडका असलेला हा पॉइण्ट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो. येथून दिसणाऱ्या दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला धनुकमळ असे म्हणत. येथून 60 कि. मी. दूर असलेल्या डहाणूजवळच्या महालक्ष्मी डोंगराचे सुंदर दृष्य दिसते. दरीतील दाट गर्द झाडीवर पडणारी सूर्य किरणे पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे.
गारेश्वर मंदिर वसई : तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत 2177 फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने व प्रसिद्ध आहे. वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्य, धबधब्यांमुळे पर्यटकांचं हिवाळा व पावसाळ्यातील खास आकर्षण बनलं आहे. परशुरामाचं येथे वास्तव्य होते. विमालासूर या राक्षसाने तपश्चर्येने भगवान शंकराला येथे येऊन राहण्यास सांगितले व भगवान शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमालासूर या राक्षसाने येथे केली, अशी आख्यायिका आहे. तुंगारेश्वर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे; परंतु मुंबईपासून थोडसं लांब असलेलं हे ठिकाण कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे मन रिझवत आहे. धबधब्याचा व थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या स्थळाला नक्की भेट द्या.
डहाणूचा किल्ला : एकेकाळी या किल्ल्याचा उपयोग व्यापारा- साठी मोठ्या प्रमाणावर केला जायचा. आजही तेथे त्याच्या काही खुणा दिसतात. किल्ल्याची रचना व मांडणी व्यापारदृष्ट्या पूरक आहे. पश्चिम रेल्वेने डहाणू स्टेशन गाठायचं. तेथून बसने 15 मिनिटात किल्यावर पोहोचता येतं.
तारापूरचा किल्ला : या किल्ल्याची मांडणी पाहण्यासारखी आहे. खाडीलगत असलेल्या या किल्ल्याचा वापर मालमत्ता ठेवण्यासाठी केला जायचा. सध्या या किल्ल्याला कुलूप लावलेलं आहे; परंतु आत जाण्यास काही अडचण येत नाही. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आणि चिकू, नारळ यांच्या बागा पाहायला मिळतील. या किल्ल्याच्या तटबंदीतून शत्रूवर गोळीबार केला जायचा. आजही ते झरोके याठिकाणी पाहता येतील. तटबंदीवरून बिनदिक्कतपणे फिरता येईल इतका सुरक्षित हा किल्ला आहे. बोईसर या रेल्वे स्थानकावर उतरून किंवा एसटी स्टॅण्डवर उतरून या किल्ल्याकडे जाता येते.
केळवे माहीम : केळवे माहीम हा किल्ला पाणकोट व भुईकोट या दोन्ही प्रकारांमध्ये आहे. भुईकोट किल्ल्यात शीतलाई देवीचं मंदिर आहे. येथून बीचवर सहजपणे जाता येतं. या किल्ल्याचा आकार स्टार म्हणजे चांदणीसारखा आहे. किल्लाच्या लगतच सुरूचं बन पसरल्यामुळे पर्यटकांची वर्दळ येथे मोठ्या प्रमाणावर असते. पोर्तुगिजांनी बांधलेला हा किल्ला उत्तम कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखला जातो. पाणकोट किल्ल्यात भरती -ओहोटीची वेळ पाहूनच जावं लागतं. पानबुडीसारखा आकार असलेला हा किल्ला 75 फूट लांब व 40 फूट रुंंद असून याची उंची 20 फूट आहे. बीचवर किल्ला असल्याने ओहोटीच्या वेळी किल्ल्यात आतमध्ये चालत जाता येतं. आतमध्ये गेल्यावर आठ झरोके पाहायला मिळतील. या झरोक्यामधून दांडा खाडीवर नजर ठेवली जायची. त्याकरता खास हा किल्ला बांधण्यात आला होता. दांडा खाडीलगत त्या काळात जवळपास 17 किल्ले होते. आज त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच किल्ले शिल्लक आहेत.
अर्नाळा : संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा. अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्र आणि हत्ती यांची सुबक शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर
वेली-फुलांची बुट्टी आपल्याला खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमध्ये शके 1659 मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच गडाचं रूप खुलून दिसतं.
सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूर्वेच्या तटाजवळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. 1516 मध्ये केली. पुढे 1530 मध्ये हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर 1737 मध्ये मराठ्यांनी जिंकला. या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं. असे दाखले इतिहासात सापडतात. पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून 14 किमीवर अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे किंवा वसईहूनही अर्नाळ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.