पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
विचारांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. विशिष्ट वर्गाच्या गुलामगिरीतून आपल्या लोकांना कसे बाहेर काढायचे, या विचारातूनच सत्यशोधक चळवळीची निर्मिती झाली असल्याने आत्मचिंतन करणे आजच्या काळाची गरज आहे. कारण सध्याचे राजकारण पाहिले तर राजकारणाच्या सोयीसाठी विचार सोडणे गरजेचे आहे का? असा थेट प्रश्न सत्यशोधक समाजाच्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना युवराज संभाजीराजे यांनी केला. (Yuvraj Sambhaji Raje)
संबधित बातम्या
सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णवर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा. हरी नरके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जयशंकर लॉन्स येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित अधिवेशनाप्रसंगी मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष विश्वासराव मोरे, सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य मागास आयोगाचे माजी सदस्य डॉ. भूषण कर्डिले, स्वराज्य संघटनेचे संपर्कप्रमुख करण गायकर, समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक आदी उपस्थित होते.
युवराज संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या विचारांनी सत्यशोधक समाजाची वाटचाल पुढे सुरू आहे. सत्यशोधक समाज हा एका धर्मासाठी मर्यादित नाही. हा एक विचार आहे. त्याची आज नितांत गरज आहे. महात्मा फुलेंनी बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन ते सक्तीचे व मोफत केले. शिक्षणाच्या बाबतीत शाहू महाराज व महात्मा फुले यांचे विचार समान होते. मराठवाड्यातील समाजाला बहुजन समाज हा शब्दच माहीत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच सत्यशोधक समाजाचे वृत्तपत्र का नाही? आपला विचार तेवत ठेवायचा असेल तर एखादी पुस्तिका काढण्याचा विचार त्यांनी मांडला.
डॉ. भूषण कर्डिले, विश्वासराव मोरे, बाळासाहेब कर्डक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सत्यशोधक समाजाच्या झेंड्याचे ध्वजारोहणाने व मशाल प्रज्वलित करून अधिवेशनाची सुरुवात झाली. वंदना वनकर यांनी सूत्रसंचालन केले. अशोक सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. अरविंद खैरनार यांनी अधिवेशनाची भूमिका मांडली. आर. बी. निकुंभ यांनी आभार मानले.
हेही वाचा :