उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रतन इंडिया प्रकल्पातून 540 मेगावॉट वीजनिर्मिती होणार; रोजगाराच्या संधी वाढणार

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : येथील रतन इंडिया प्रकल्पातून वीजनिर्मितीसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. या ठिकाणाहून लवकरच 540 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होणार आहे.

मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात गुळवंच येथील रतन इंडियाचा औष्णिक वीजप्रकल्प सुरू करण्यासाठी आमदार कोकाटे यांच्या मागणीवरून बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार कोकाटे यांनी, 1,350 मेगावॉटचा औष्णिक वीजप्रकल्प सुरू झाला, तर या भागात रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच 20 किमी परिघातील शेतकर्‍यांना 24 तास वीजपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी महाजनकोच्या अधिकार्‍यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर महाजनको व महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाकडे यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या 3 दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करीत आहे. रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवित त्यांनी केंद्र सरकारला अहवाल पाठवला आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शविली असल्याचे आमदार कोकाटे यांनी सांगितले. प्रत्येकी 270 मेगावॉटचा एक असे दोन युनिट सुरू होणार आहेत. उर्वरित कामे होऊन, महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या एनटीपीसी विभागाच्या माध्यमातून वीजनिर्मितीसाठी प्रयत्न होत आहेत.

रतन यांची विनंती आणि आमदार कोकाटे यांचे प्रयत्न : बैठकीसाठी प्रकल्पाचे मालक राजीव रतन हे दूरस्थ प्रणालीद्वारे हजर होते. हा प्रकल्प चालविण्याची कंपनीची आर्थिक क्षमता राहिली नसल्याने त्यांनी सरकारी भागीदारीत हा प्रकल्प सुरू करण्याची विनंती ना. पवार यांच्याकडे केली होती. रतन इंडियाचे अधिकारी राठोड व सहकार्‍यांनी आमदार कोकाटे यांना प्रकल्पातील अडथळे सांगून त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचीही माहिती दिली. त्यानुसार आमदार कोकाटे वरिष्ठ अधिकार्‍यांकडे बैठक घेऊन पाठपुरावा करत होते. शेवटी सर्वांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती झाली.

25 हजार रोजगार उपलब्ध : हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर पुरेशी वीज उपलब्ध होईल. त्यातून नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांतील विशेष करून नाशिक जिल्ह्यातील कारखानदारी वाढीस लागेल. तालुक्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 25 हजार रोजगार उपलब्ध होतील. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे अधिकारी, रतन इंडियाचे अधिकारी व केंद्र सरकारच्या एनटीपीसी विभागातील अधिकार्‍यांनी या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. 540 मेगावॉट वीजनिर्मितीतून या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. – माणिकराव कोकाटे, आमदार.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT