Ajit Dada Pawar News Pudhari
नंदुरबार

Ajit Pawar News: अजितदादांच्या निधनाने नंदुरबार जिल्हा शोकमग्न; कणखर नेतृत्व हरपल्याची मान्यवरांची भावना

माजी खासदार डॉ. हिनाताई गावित, आमदार, खासदार व विविध पक्षांच्या नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली; ‘महाराष्ट्राची कधीही न भरून निघणारी पोकळी’

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख व सर्वांना आधार वाटेल असे कणखर नेते अजित दादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला मोठा धक्का देणारी आहे. पवार परिवाराशी आमच्या गावित परिवाराचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे ही घटना आम्हाला सर्वांना चटका देऊन गेली.

अजित दादा हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांसाठी झटणारे प्रामाणिक नेते होते. राजकारणातील सर्वात शिस्तबद्ध, स्पष्टवक्ता आणि कणखर नेता त्यांच्या रूपाने आम्ही अनुभवला. माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब मंत्री असताना अजितदादा यांनी सकारात्मक राहून नेहमीच निधी मिळवून देण्याला मदत केली. त्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विकास कामांना गती मिळू शकली. त्यांच्याकडे अर्थ खाते असो, जलसंपदा असो अथवा जे पण महत्त्वाचे खाते असेल त्यातून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी तत्परतेने मदत दिली. खासदार असताना मला सुद्धा त्यांनी अनेकदा सकारात्मक राहून मदत केली. दोन वर्षांपूर्वी झेडपी अध्यक्षाना ग्रामीण डोंगराळ भागात दौरे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून चांगले वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी अजितदादा यांच्याकडे केली होती. ती बाब लगेचच मनावर घेऊन अजितदादा यांनी त्या काळी महाराष्ट्रातील सर्व झेडपी अध्यक्षांना चांगले स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्याविषयीचा जीआर तात्काळ काढला होता. अशा सर्व संदर्भाने ते आमच्या सदैव स्मरणात राहतील. त्यामुळेच नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याची जाणीव ठेवून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आस्था बाळगणारे एक जिव्हाळ्याचे नेतृत्व आपल्यातून निघून गेल्याची भावना आज मनात दाटून आली आहे.. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि गावित परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉक्टर हिनाताई गावित, माजी खासदार, नंदुरबार.

अजित दादांचे अचानक जाणे महाराष्ट्राला हानिकारक : विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी

नेहमी खरे बोलणारा, स्पष्ट बोलणारा राजकारणातला खरा नेता आज हरपला. राजकारणात आता खरे बोलणारे स्पष्टवक्ते नेते राहिलेले नाहीत. परंतू अजितदादा त्या विद्यापीठाचे प्राचार्य होते. आमच्यासाठी ते आदर्श नेते होते. त्यांच्याकडे पाहूनच आतापर्यंत काम केले. त्यांच्या अकस्मात निधनामुळे फक्त पवार परिवाराची किंवा राष्ट्रवादीची हानी झालेली नाही तर पूर्ण महाराष्ट्राचेच नुकसान झाले आहे. महाराष्ट्र घडविण्यात योगदान असलेल्या महत्वाच्या नेत्यांचा उमेदीच्या काळातच मृत्यू व्हावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर.आर.पाटील आणि आता अजित पवार यांच्याबाबतीत असेच घडले आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

- आ.चंद्रकांत रघुवंशी, विधान परिषद सदस्य तथा एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हा नेते, नंदुरबार

महाराष्ट्राने सर्वसमावेशी नेतृत्व गमावलं: भाजपा आमदार राजेश पाडवी

अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. एक सक्षम नेतृत्व आणि सर्वांना घेवून चालणारे व्यक्तीमत्व होते. माझ्या सहा वर्षात कार्यकाळात त्यांनी प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला स्वतः फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. असे हे व्यक्तीमत्व होते, ज्यांनी छोटया मोठयांचा कधीही भेदभाव केला नाही. सर्वांना सोबत घेवून चालणारे ते नेते होते. मी अनेकवेळा ते उपमुख्यमंत्री असतांनासुद्धा त्यांना रस्त्यावर उभे करुन विकास कामांच्या मंजूरीच्या सहया घेतल्या आहेत. असे एक चमकदार नेतृत्व महाराष्ट्राने गमावल्याचे दुःख आहे.

- आमदार राजेश पाडवी, शहादा-तळोदा मतदार संघ

शब्दाला जागणारा खंबीर नेता सोडून गेला: आमदार शिरीष नाईक

खंबीर आणि स्पष्टवक्ता नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला

सर्वांचे आवडते अजित दादांचे आज दुःखद आणि तेवढेच धक्कायदायक निधन झाले. अजित दादांचा स्वभाव रोखठोक होता. त्यांनी कोणत्या गोष्टीला हो सांगितले तर त्याचे काम खात्रीशीर होणारच. बर्‍याचवेळी मी नवापूरच्या विकास कामानिमित्त त्यांना भेटत असे. ते नेहमी व्यक्तीगतरित्या ओळखून नावाने हाक मारायचे. ते एक आदरणीय व्यक्तीमत्व होते. एक महिन्यापुर्वी माझे वडील नाईक साहेबांचे निधन झाले, त्यावेळी त्यांनी फोन करुन सहवेदना व्यक्त केल्या होत्या. अशा या खंबीर आणि स्पष्टवक्ता असलेल्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला असून त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरुन निघणार नाही.

- आ.शिरीष नाईक,नवापूर विधानसभा मतदार संघ

महाराष्ट्राचा एक उमदा नेता काळाच्या पडद्याआड: माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी

आज त्यांच्या अपघाताचे वृत्त अत्यंत अस्वस्थ करुन गेले. कारण अजित दादा हे अचानक अशाप्रकारे जातील याची कल्पनाही कधी केली नव्हती. महाराष्ट्राचा एक उमदा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. दादांनी कधीही आपली विचारसरणी सोडली नाही. मला अडीच वर्ष त्यांच्यासोबत मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. ते आपल्या कामात अत्यंत शिस्तप्रिय होते. सकाळी सहा वाजेपासूनच त्यांचे काम सुरु व्हायचे. विलासराव देशमुखांनंतर महाराष्ट्राचे एक आदरणीय नेते म्हणून अजितदादा होते. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरुन निघणार नाही.

- ऍड.के.सी.पाडवी, माजीमंत्री, अक्राणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT