

Government has clarified details of Ajit Pawar plane crash
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. या अपघातापूर्वी नेमके काय घडले, याची सविस्तर माहिती सरकारने एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध केली आहे. विमानाचा पहिला संपर्क झाल्यापासून ते विमान कोसळण्यापर्यंतच्या घटनाक्रमाचा थरार या निवेदनातून समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी बारामतीमधील धावपट्टीवर विमानाने उतरण्याचा पहिला प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सकाळी ८:४३ वाजता एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्यासाठी परवानगी दिली होती. नियमानुसार वैमानिकाकडून या सूचनेस प्रतिसाद मिळणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. अवघ्या एका मिनिटात, म्हणजेच ८:४४ वाजता एटीसीला विमानाला लागलेल्या आगीच्या ज्वाळा दिसल्या.
या संपूर्ण दुर्घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने कोणताही 'मे-डे' (MAYDAY) कॉल किंवा कोणत्याही प्रकारची धोक्याची सूचना एटीसीला दिली नव्हती. दरम्यान, 'विमान अपघात तपास ब्युरो'ने (AAIB) या प्रकरणाचा तपास हाती घेतला असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, दाट धुके आणि कमी दृश्यमानता (Low Visibility) हे या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
सकाळी ०८:१८: 'VI-SSK' या विमानाचा बारामती एटीसीशी पहिला संपर्क झाला.
पुण्याहून बारामतीच्या दिशेने ३० नॉटिकल मैलावर असताना विमानाचा ताबा बारामती एटीसीकडे देण्यात आला. यावेळी वैमानिकाला स्वतःच्या निर्णयानुसार हवामानाचा अंदाज घेऊन विमान उतरवण्यास सांगण्यात आले.
वैमानिकाने वारा आणि दृश्यमानतेबाबत विचारणा केली असता, वारा शांत असून दृश्यमानता ३००० मीटर असल्याचे सांगण्यात आले.
धावपट्टी ११ वर उतरण्याचा प्रयत्न करताना धावपट्टी दिसत नसल्याने वैमानिकाने 'गो-अराउंड' (विमान पुन्हा वर नेणे) करण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या प्रयत्नात सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याचे वैमानिकाने कळवले, मात्र काही सेकंदातच "रनवे दिसत आहे" असा संदेश त्यांनी दिला.
८:४३ ते ८:४४: सकाळी ८:४३ ला लँडिंगची परवानगी दिली, पण प्रतिसादाऐवजी ८:४४ वाजता धावपट्टीच्या सुरुवातीलाच आगीचा लोळ पाहायला मिळाला.