Contaminated Water Issue BJP Protest Pudhari
अहिल्यानगर

Shrirampur Contaminated Water Issue: श्रीरामपूरमध्ये मैलामिश्रित पाण्याचा आरोप; भाजपचे पालिकेत ठिय्या आंदोलन

पाणीपुरवठ्यावरून राजकारण तापले, नगराध्यक्षांनी आरोप फेटाळले

पुढारी वृत्तसेवा

श्रीरामपूर: गेल्या 8-10 महिन्यांपासून शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून मैलामिश्रीत पाणी येत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. आजही श्रीरामपूरच्या नागरिकांना मैलामिश्रीत पाणी प्यावे लागत असून त्याविरोधात भाजपच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ‌‘भाजपा शहर‌’च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात पालिकेच्या भाजपाच्या गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेवक जितेंद्र छाजेड, दीपक चव्हाण, संजय गांगड, रवी पाटील, आशिष धनवटे, मनोज लबडे, संजय छल्लारे, पूजा चव्हाण, केतन खोरे, रुपेश हरकल, बाळासाहेब हरदास, विशाल अंभोरे, अर्जुन कर्पे, अमोल शेटे, प्रतीक वैद्य, सुभोत शेवतेकर, प्रशांत शितोळे, सचिन धोत्रे, राहुल फुलारे, नवनाथ पवार, किरण पठारे, अवधूत शिंदे, सागर म्हस्के, कार्तिक मंडवे, अजय छल्लारे, किरण कर्नावट, अनिल खंडागळे, सचिन पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गेल्या दोन महिन्यापासून मैलामिश्रित पाणी येत असून पालिकेने यावर कोणतीही उपाय योजना केल्या नसल्यामुळे भाजपाचे नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणा दूर करण्याची मागणी नगरसेवक संजय गांगड व रवी पाटील यांनी केली. सहा महिन्यांपूर्वी अशी घटना घडली असून याबाबत पुढे काय झाले ? शाश्वत उपाय कधी काढणार ? असे अनेक प्रश्न माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक दीपक चव्हाण यांनी उपस्थित केले. दरम्यान, दूषित पाण्याबाबत व्हायरल व्हिडिओची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी, साठवण तलाव आणि पाणीपुरवठा लाईनची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी केली.

....आज पहिलीच सर्वसाधारण सभा गाजणार

श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज गुरुवारी पहिलीच सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत अतिक्रमण, विस्थापित दुकानदार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि तलावात पाईप लाईनद्वारे सोडण्यात आलेले मैलामिश्रित पाणी हे प्रश्न गाजणार असून याचबरोबर सभेच्या विषयपत्रिकेवरून ससाणे यांनी शहराच्या प्रलंबित प्रश्नांना थेट हात घातला जाणार आहे. याप्रश्नांना नगराध्यक्ष ससाणे कसे तोंड देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण लक्षात घेता, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचा तांत्रिक आढावा घेणे, हे विषय अग्रक्रमाने अजेंड्यावर आहेत. याशिवाय, शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या व्याख्यानमालांना पुन्हा सुरू करण्याचे नगराध्यक्ष ससाणे यांनी सांगितले. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी प्रलंबित असलेल्या रिंग रोडच्या विकासाचा प्रश्न या सभेत मार्गी लागण्याची शक्यता आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत गांभीयनि विचारविनिमय केला जाणार आहे. यावेळी विविध 30 विषयांची भरगच्च जंत्री विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

मैलामिश्रित पाणी नाहीच: नगराध्यक्ष ससाणे

श्रीरामपूर शहरातील पिण्याच्या पाण्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष करण ससाणे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, काल माझ्यासह गटनेते मुजफ्फर शेख, पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश जाधव, आरोग्य समितीचे सभापती दीपक वमने तसेच पालिका अधिकाऱ्यांसमवेत पाणी साठवण तलाव व संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीत कुठेही मैला मिश्रित अथवा दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे नगराध्यक्ष ससाणे यांनी सांगितले. शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सुरळीत पिण्याचे पाणी देण्यासाठी नगरपरिषद पूर्णतः कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT