

नगर: अहिल्यानगर पोलिस दलातील शिपाई पदाच्या 73 रिक्त पदांसाठी 4 हजार 148 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात 812 महिला उमेदवारांचे अर्ज आहेत. पोलिस शिपाई पदासाठी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांनी अर्ज केले आहेत. व्यावसायिक कोर्स असणाऱ्या इंजिनीअर, वकील आणि फार्मसीची पदवी घेतलेल्या तरुणांनीही या नोकरीसाठी अर्ज केले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यासह प्रत्येक जिल्ह्यात सध्या पोलिस भरती सुरू आहे. अहिल्यानगर पोलिस दलाकडून 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पोलिस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
पोलिस शिपाई पदाच्या 73 रिक्त जागांसाठी सुमारे 4 हजार 148 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात 812 महिला उमेदवारांचे अर्ज आहेत. माजी सैनिकांचे 142 अर्ज आहेत. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया पार पडणार आहे. 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक अशा मैदानी चाचण्या होणार आहेत. नंतर लेखी परीक्षा होणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी जिल्हा पोलिस दल सजग असल्याचे सांगण्यात आले.
चारशे अधिकारी-कर्मचारी भरतीसाठी सज्ज
पोलिस भरती पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सुमारे चारशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात 45 अधिकारी व 350 अंमलदारांचा समावेश आहे. तर, 30 जिल्हा लिपिक कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे.
भावी पोलिसांच्या पदव्या...
पोलिस शिपाई पदासाठी विविध विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. त्यात बीए, बीबीए, बीसीए, बी.कॉम., बीई, हॉटेल मॅनेजमेंट, बीएस्सी, बी.टेक., बीसीएस, एलएलबी अशा पदवीधर आणि एम.कॉम, एम.फार्म, एम. ए, एमबीए, एमसीए, एमसीएस, एमई, एम.फार्म, एमएस्सी, एमएसस्सी ॲग्री अशा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. उच्च व्यावसायिक शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने इंजिनीअर, वकील, फार्मासिस्ट, हॉटेल मॅनेजमेंटच्या उमेदवारांनी पोलिस शिपाई होण्यासाठी सरसावल्याचे वास्तव त्यातून समोर आले आहे.
पोलिस भरतीसाठी समिती
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे समितीचे अध्यक्ष आहेत. तर, अल्पसंख्याक समाजाचा अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, आदिवासी विकास अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे.
पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. धावणे, गोळाफेक व लेखी परीक्षा सर्व काही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली होणार आहे.
सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक