पाथर्डी: श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिराचा फाल्गुन शुद्ध दशमीनिमित्त पारंपरिक कलशारोहण सोहळा भक्तिभावात झाला. भट्टी सण ते गुढीपाडवा या कालावधीत चार टप्प्यांत साजऱ्या होणाऱ्या यात्रा महोत्सवाच्या पहिल्या टप्प्यास या सोहळ्याने विधिवत प्रारंभ झाला.
नाथसंप्रदायात अत्यंत श्रद्धेचा मानला जाणारा हा दिवस पवित्र निशाण प्रस्थान सुरू होण्याचा शुभमुहूर्त मानला जातो. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. विधीपूर्वक कळसपूजा, महाअभिषेक व आरती करून कळसांचे संजीवन समाधीला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शुभमुहूर्तावर मंदिर शिखरावर कळसारोहण करण्यात आले.
फाल्गुन शुद्ध सप्तमीला मंदिराच्या शिखरावरील सर्व कळस उतरवून त्यांची स्वच्छता, रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यात आली होती. नंदादीप आणि पंचधातूच्या घोड्याचीही देखभाल करण्यात आली. दशमीच्या दिवशी सामुदायिक महापूजेनंतर हे पवित्र कळस पुन्हा शिखरावर विराजमान करण्यात आले.
कलशारोहणानंतर गावोगावी काठी (निशाण) प्रस्थानास सुरुवात होते. अनेक नाथभक्त आपल्या कुलदैवताच्या मानाप्रमाणे नाथांची उपासना करून गावात पवित्र काठीची स्थापना करतात. पारंपरिक वेशभूषेत आणि वाद्यांच्या गजरात या काठ्या रंगपंचमी यात्रेसाठी मढीकडे प्रस्थान करतात. नाथशिखराला भेट देत भक्तिभावाने मिरवणुका काढल्या जातात. ही परंपरा नाथसंप्रदायातील ऐक्य व श्रद्धेचे प्रतीक मानली जाते.
सकाळपासून समाधी मंदिरासमोर ठेवलेल्या पवित्र कळसांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रसंगी देव ट्रस्टचे चिटणीस अनिल साठे, विश्वस्त उत्तम मरकड, उषा मरकड, रवी आरोळे, कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड, डॉ. रमाकांत मरकड, रमेश ताठे उपस्थित होते.
यात्रा महोत्सव विविध टप्प्यात होणार असून दि. 2 मार्चला मानाची होळी, 8 मार्चला रंगपंचमी महोत्सव, 11 ते 17 मार्चदरम्यान मुक्तद्वार दर्शन, 18 मार्च रोजी फक्त कावड भक्तांसाठी समाधी मंदिर प्रवेश, 19 मार्चला काकड आरती व महापूजनानंतर पादुका दर्शन पुन्हा सुरू होणार आहे. यात्राकाळात भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात येत असल्याचे देवस्थान ट्रस्टचे चिटणीस अनिल साठे यांनी सांगितले.