नगर: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक खळबळजनक शिक्षण घोटाळासमोर आला असून, एमएचटी-सीईटी परीक्षेतील हजारो विद्यार्थ्यांचा खासगी डेटा चोरून खासगी सल्लागार संस्थांना विकल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडसह प्राध्यापकांनी केला आहे. याप्रकरणी अहिल्यानगरात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर शेकडो विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांनी धडक मोर्चा काढून, पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, जिल्हा संपर्कप्रमुख श्याम जरे, प्रा. नारायण शिनगारे, प्रा. अजित खरसडे, प्रा. विवेक डोके, प्रा. सच्चिदानंद घोणसे, प्रा. सुषमा पोळ, प्रा. बाळासाहेब कीर्तने, सुदाम कोरडे, सचिन काकडे, महेश दानवे, प्रशांत कांबळे, दादा ठोंबरे, विद्यार्थी गायत्री शिरसाठ, श्रेयसी कदम, शर्वरी राऊत, प्रणव सावंत, सार्थक शिनगारे, उत्कर्ष पोटे, सार्थक अंदुरे, ओम पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, एमएचटी- सीईटी परीक्षेत मोठा घोटाळा झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना दहावी बारावी परीक्षेत अवघे ५० टक्के मार्क आहेत. मात्र, सीईटी परीक्षेत त्या विद्यार्थ्यांना ९९ पर्सेंटाइल मिळाले आहे. अनेक सेंटरवर परीक्षा मॅनेज केल्याचा आणि विद्यार्थ्यांचा डेटा चोरल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सीईटी सेलचे सर्व्हर लॉग आणि डेटा एक्सपोर्ट लॉग जप्त करून तात्काळ गुन्हा दाखल करावा. संशयित परीक्षा केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज आणि संगणक लॉग ताब्यात घेण्यात यावेत, शंभर पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्स शीटची फॉरेन्सिक चौकशी व्हावी, सल्लागार संस्थांचे मोबाईल, लॅपटॉप आणि बँक/युपीआय व्यवहारांची चौकशी करावी, हे प्रकरण आंतरजिल्हा असल्याने सीबीआय, सीआयडी किंवा राज्य सायबर विभागाकडे तपासासाठी सोपवावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
अण्णासाहेब सावंत यांनी या घोटाळ्यामागे मोठी साखळी कार्यरत असल्याचा आरोप केला. यात सीईटी सेलमधील अधिकारी, तांत्रिक कंपनी, डेटा खरेदी करणाऱ्या संस्था व ठराविक परीक्षा केंद्रांचे मालक सहभागी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. तक्रारीची सायबर सेलला चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, चौकशीत काहीही गैरप्रकार आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आणि जात-प्रवर्ग असलेली संपूर्ण एक्सेल फाईल खासगी संस्थांकडे कशी पोहोचली? या संस्थांमधून नामांकित संस्थांमध्ये पैशांच्या जोरावर प्रवेश देण्याचे फोन विद्यार्थ्यांना येत आहेत. याप्रकरणी दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.राजेश परकाळे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
२०२२ मध्ये एमएचटी-सीईटीच्या पहिल्या १०० टॉपर्सपैकी केवळ २ टक्के विद्यार्थी असे होते ज्यांना १०वी-१२वीत ६०-७० टक्के पेक्षा कमी गुण होते. २०२४ मध्ये हे प्रमाण ६० टक्के वर तर यावर्षी २०२६ मध्ये थेट ९० टक्के वर पोहोचले आहे. १०वी-१२वीत साधे पास होणारे विद्यार्थी थेट ९९ ते १०० पर्सेंटाइल मिळवून टॉपर होत आहेत, आणि हे सर्व विद्यार्थी एका विशिष्ट नेटवर्कशी जोडलेल्याचा संशय आहे.प्रा. नारायण शिनगारे