Election Candidate Interviews Pudhari
अहिल्यानगर

Election Candidate Interviews: कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी काळे-कोल्हे गटाकडून इच्छुकांची मुलाखत सुरू

कोपरगावकरांचा सूर स्पष्ट – घोषणांवर नव्हे, कृतीशील व सक्षम नेतृत्व हवे

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव: नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच, कोपरगावात नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दाटली आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाली सुरू आहेत. अनेक नव्या चेहऱ्यांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. दरम्यान, काळे-कोल्हे गटाकडून नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. शहराच्या राजकीय वातावरणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात स्थानिक पातळीवर कोण- कुणाशी युती करणार, निवडणूक रणनिती कशी आखणार, याचे डावपेच टाकणे सुरू झाले आहे. (Latest Ahilyanagar News)

कोपरगाव शहराला आता ‌‘स्वच्छ, सुरक्षित व सक्षम नेतृत्वाची‌’ गरज आहे, अशी चर्चा सध्या नागरिकांत रंगत आहे. धार्मिक, व्यापारी व शैक्षणिक क्षेत्रात कोपरगाव शहराने गेल्या काही वर्षात चांगली प्रगती साधली, तरीही गेल्या तीन- चार वर्षांपासून प्रशासक राज असल्यामुळे शहर स्वच्छता, रस्ते, पिण्याचे पाणी, वीज हे मुख्य प्रश्न व लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचे, स्वच्छतागृहे नसल्याची होणारी ओरड आदी मुलभूत प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांनी कोपरगाव शहराची पूर्णतः वाट लावली आहे. अतिक्रमणे काढल्यानंतर विस्थापितांना देण्यात येणारे खोका शॉप, गाळे हा प्रश्न कायम अनुत्तरीतच आहे. शहरात अतिक्रमणे अस्वच्छता, धूळ, रस्त्यांची दुर्दशा, पाणी पुरवठ्याची अनियमितता, आरोग्यसेवेची अपुरी साधने व अतिक्रमणाच्या समस्या यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.

कोपरगावात काही विकासकामे झाली, परंतू ती टिकाऊ ठरली नाहीत. नागरिकांना दिलेली आश्वासने व वास्तव यात फरक दिसत असल्यामुळे भ्रमनिरास झाला आहे. यामुळे कोपरगावकरांचा सूर आता स्पष्ट आहे की, ‌‘वादे नकोत, विकास हवा!‌’

केवळ घोषणांवर आधारित राजकारणाचा काळ संपला आहे. नागरिकांना आता कृतीशील, पारदर्शक व जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व हवे आहे. प्रशासनात पारदर्शकता, नागरिकांचा सहभाग व दीर्घकालीन नियोजन या तिन्ही बाबी आजच्या काळाची खरी गरज ठरत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पायाभूत सुविधा व स्वच्छतेचा विस्तार होणे अत्यावश्यक आहे.

राजकीय गटबाजी, पक्षीय स्वार्थ व दिखाव्याच्या राजकारणामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. यामुळे यावेळी मतदार अधिक जागरूकपणे मतदान करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, कामगिरी व शहर विकासाविषयी दूरदृष्टी या मुद्यांवरच निवडणुकीचा कौल ठरणार आहे.

कोपरगाव शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणारा, समस्यांकडे गांभीर्याने पाहणारा व नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरणारा नगराध्यक्षचं शहराचा खरा चेहरा ठरेल, अशी चर्चा सुरु आहे.

वादे नकोत...

आता काम पाहिजे, असा कोपरगावकरांचा एकमुखी आवाज ऐकू येत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची ठाम भूमिका बोलणारा नव्हे, काम करणारा, जनतेत राहणारा नगराध्यक्ष हवा, असा जनतेचा स्पष्ट संदेश उमेदवारांपर्यंत पोहोचत आहे.

कोपरगावकरांचा एकच सूर!

कोपरगावकर सूर एकच आहे की, घोषणाबाज नव्हे, कृतीशील नगराध्यक्ष हवा! गेल्या पाच वर्षांत अनेक वचने दिली गेली, पण बहुतांश अपूर्णच राहिली. त्यामुळे यावेळी नागरिकांच्या अपेक्षा आकाशाला भिडल्या आहेत - जनतेत मिसळणारा, समस्यांना भिडणारा आणि कामगिरीतून विश्वास जिंकणारा नेता हवा!

केवळ आश्वासन नव्हे तर, कृती हवी आहे!

भाजप, ठाकरे सेना गट, शिंदे सेना गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, बहुजन विकास आघाडी, वंचित आघाडी हे सर्व पक्ष व मुख्य असलेले काळे- कोल्हे, परजणे- विखे यांचे गट आगामी निवडणुकीत कोणती भूमिका घेतात. जनतेच्या मूलभूत प्रश्नांना कसे सामोरे जातात, हे आता पहावे लागणार आहे. प्रत्येकाची ही कसोटी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT