करंजी: येथील व्यानसायिकांनी १३ लाख रुपये स्वखर्चातून उभारलेल्या उभारलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन महंत आदिनाथ महाराज शास्त्री व आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. बंधारे, पूल, रस्ते, जमिनी खरडून गेल्या. अनेकांचे संसारोपयोगी वस्तू पुरात वाहून गेल्या. मोठे नुकसान अतिवृष्टीमुळे करंजीकरांचे झाले. त्या नुकसानीतून करंजीकर अजूनही तितकेसे सावरलेले नाहीत.
अनेकांचा रस्त्याचा, पुलाचा, बंधाऱ्याचा जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, काहींनी या अस्मानी संकटावर प्रभावीपणे मात करण्याचा प्रयत्न केला. करंजी येथील बंडू भाऊसाहेब अकोलकर, अशोक काळे ,दीपक मुटकुळे या व्यावसायिकांनी त्यांच्या घर, दुकानाजवळचा पूल वाहून गेल्याने आता या ठिकाणी नव्याने 13 लाख रुपये खर्च करून तंत्रशुद्ध पद्धतीने नवीन पूल उभारला आहे.
जेणेकरून या नवीन पुलामुळे वाहतुकीचा प्रश्नही मार्गी लागेल आणि नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याला अडथळा दूर होईल. या नवीन पुलाचे उद्घाटन महंत आदिनाथ महाराज शास्त्री व आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे. यावेळी बंडू अकोलकर, अशोक काळे आणि दीपक मुटकुळे, कारागीर नामदेव नरवडे, सिराज शेख यांचा देखील सन्मान आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.
धर्मकार्यातील सहभाग महत्त्वाचा!
स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी हिंदू धर्म कार्यात नेहमी परखड भूमिका घेतली त्याच पद्धतीने युवा आमदार अक्षय कर्डिले देखील धर्मकार्यात नेहमी पुढे असतात. त्यांचा धर्मकार्यातील सहभाग महत्त्वाचा असून, आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे कार्य आणि विचार निश्चितपणे अक्षय कर्डिले जनसामान्यांच्या सेवेतून पुढे घेऊन जातील असा विश्वास महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केला.