

श्रीगोंदा: मागील आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यातील पठारवाडी चौकात लोणी व्यंकनाथ येथील एमआयडीसी भुंखडातील माती उपसा करण्यावरून दोन गटांमध्ये मारामारी, गाड्यांची मोडतोड आणि दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबार झाल्याची घटना घडली होती.
पोलिस ठाण्यात या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल नसला तरी या घटनेने पोलिसांची झोप उडाली आहे. भविष्यात टोळीयुद्ध भडकू नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मुम्मका सुदर्शन यांनी या प्रकरणाची गांभीर्याने घेतली असून ,पुढील ऑपरेशन करण्यासाठी गोपनीय अहवाल मागितला असल्याची माहिती समजते.
या प्रकरणाबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने बेलवंडी व श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेकडून माहिती मागितली होती. मात्र, थेट माहिती मिळाली नाही. त्यावर जिल्हा गोपनिय शाखेने वेगवेगळ्या अँगलने माहिती काढली असल्याची माहिती समजते.
माती, मुरुम उपशातून कमी श्रमात मुबलक पैसा मिळत असल्याने अनेक तरुण या उद्योगाकडे वळले आहेत. काही तरुणांनी सावरकरांचे कर्ज काढून हायवा घेतले आहेत. मात्र, हायवा मालकांना लक्ष करण्यासाठी सराईत गुन्हेगारांनी आम्हाला ह्प्ता द्या, तरच धंदा करा, अशा प्रकारची दहशत काही गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांकडून होत आहे.
आपला हप्ता चुकविण्यासाठी काही हायवा मालक या गुन्हेगारांशी संगनमत करीत आहेत .अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या धंद्यातूनच मागील आठवड्यात दोन गटांत धुमश्चक्री झाली. हे युद्ध होऊ नये म्हणून लोणी व्यंकनाथ, येळपणे, चिंभळे, बेलवंडी येथील हायवाच्या मालकांची माहिती घेऊन त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती समजते.