Goda to Narmada Jal Yatra 2026 Pudhari
अहिल्यानगर

Goda to Narmada Jal Yatra 2026: ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेला चौंडीहून प्रारंभ; जलसंवर्धनाचा नवा संदेश

एकनाथ शिंदे यांची उपस्थिती; अहिल्यादेवींच्या वारशातून समाजजागृतीचा संकल्प

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: श्री क्षेत्र चौंडी ही मराठी संस्कृतीचे माहेरघर असून गेल्या 300 वर्षांपासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ‌‘गोदा ते नर्मदा‌’ यात्रेचा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. इतिहास, संस्कृतीचा व लोकभावनेचा सन्मान करत ही यात्रा राज्यातच नव्हे तर देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथून शनिवारी ‌‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026‌’ जलजागृती यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडकुते, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, प्रवीण कोल्हे, देविदास महाराज, पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज झिंझुर्डे, दयानंद महाराज कोरगावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कार्यातून स्वराज्याचा विस्तार केला. सुशासन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन आणि राष्ट्रनिर्मिती ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धन, धर्मशाळांची उभारणी, मंदिरांचे जीर्णोद्धार, नद्यांवर घाटांची निर्मिती, आदर्श कर व्यवस्था तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलती देऊन समाजहिताचे कार्य केले.

मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणीपुरवठा, नद्यांचे पुनरुज्जीवन, दुष्काळग्रस्त भागांकडे पाणी वळविणे तसेच धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन यावर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. सीना नदीतील पवित्र जलपूजन करून कलश घेऊन यात्रा महेश्वरकडे मार्गस्थ झाली. चौंडी येथून निघालेली यात्रचे पहिला मुक्काम अहिल्यानगर येथे तर दुसरा शिर्डी येथे असून त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या यात्रेसोबत एकत्रितपणे घृष्णेश्वरकडे प्रस्थान करणार आहे.

जलसंवर्धनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प : प्रा. राम शिंदे

सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. ‌‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026‌’ ही त्यांच्या कार्याला उजाळा देणारी असून या माध्यमातून समाजात सकारात्मकबदल घडविण्याचा संकल्प आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी या संकल्पनेतून चौंडी येथून निघालेली ही यात्रा जनतेमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले. शेती विकास, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण आणि निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT