Anna Hazare Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Anna Hazare Protest: अण्णा हजारे आज अहिल्यानगरात मौन धरणे आंदोलनावर; आंदोलनकर्त्यांवरील कारवाईबाबत सरकारचे लक्ष वेधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवत संवादातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन; वाडिया पार्क येथील गांधी स्मारकासमोर सकाळी 11 ते 1 दरम्यान आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पारनेर: देशात विविध प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने संघर्षाचा मार्ग स्वीकारल्याने हिंसक घटना घडल्या आहेत. आंदोलनकर्त्यांवरील पोलिस कारवाईबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी चिंता व्यक्त केली असून, आज गुरुवारी (दि. २३) सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ते अहिल्यानगरच्या गांधी स्मारक, वाडीया पार्क येथे एक दिवसाचे मौन धरणे आंदोलन करून ते सरकारचे लक्ष वेधणार आहेत.

आण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रातून लोकशाही मूल्य जपली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी देशातील वेगवेगळ्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन पंतप्रधानांना केले आहे.

आण्णा हजारे यांनी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसक घटना आणि पोलिस कारवाईबाबतही चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि अनावश्यक बळाचा वापर टाळला पाहिजे, असे सांगत आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि मागण्यांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने न पाहता संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

देशातील युवक प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना, स्पर्धा परीक्षांतील अनियमितता, भरती प्रक्रियेतील विलंब आणि वाढती बेरोजगारी यामुळे अस्वस्थ असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असून, संबंधित प्रकरणांमध्ये पारदर्शक चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जनतेचा शासनावरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आंदोलनकर्त्यांशी तातडीने सकारात्मक संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि न्याय्य व पारदर्शक निर्णय घेऊन लोकशाही मूल्ये अधिक बळकट करावीत, अशी अपेक्षा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे.

नगरचे ‘जंतरमंतर’..

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात आहे. त्यामुळे या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आण्णा हे आज गुरुवारी ‘नगरचे जंतरमंतर’ अर्थात वाडीयापार्क येथील गांधीस्मारकासमोर धरणे आंदोलन करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT