नगर: यंदा पर्जन्यमान कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात असला तरी पशुधनासाठी चारा मात्र मुबलक उपलब्ध आहे. पुढील किमान सात महिने पुरेल इतका म्हणजे सुमारे 73 लाख मेट्रिक टन चारा जिल्ह्यात उपलब्ध असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. याशिवाय, पुढील आठवड्यात जिल्हा नियोजनमधून पाच कोटींच्या चारा बियाण्याचे वाटपही करण्यात येणार असल्याने चाऱ्याबाबत जिल्हा समृद्ध असल्याचे दिसत आहे.
यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी रहाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा वेळी जनावरांसाठी चाऱ्याची काय परिस्थिती राहील, अशीही चिंता आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने घेतलेल्या उपाययोजनांमध्ये ही चिंताही दूर होताना दिसत आहे.
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. उमेश पाटील तसेच पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे यांनी चाऱ्याच्या बाबतीत मायक्रो नियोजन केले आहे. जिल्ह्यात छोटी-मोठी असे सुमारे 32 लाख पशुधन आहे. त्यांना दर महिन्याला साधारणतः 10 ते 12 लाख टन चारा लागतो. शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामात घेतलेल्या चारा पिकांपासून 73 लाख टन चारा उपलब्ध होत आहे. यात मका, मूरघास, गिन्नी गवत इत्यादीचा समावेश आहे. हा चारा पुढील सात महिने म्हणजे नोव्हेंबरपर्यंत पुरण्याचा अंदाज आहे.
कृषी विद्यापीठाशी पत्रव्यवहार
चारा पीक घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महात्मा फुले कृषि विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला आहे. विद्यापीठाने राहुरी कार्यक्षेत्रात चारा पिके घेण्याची तयारी दर्शवली तर त्यांना बियाणे जिल्हा नियोजनच्या तरतुदीतून पुरवली जाणार असल्याचे सांगितले जाते.
जिल्हा नियोजनमधून पाच कोटींचे बियाणे
जिल्ह्यात चाऱ्याची समस्या भेडसावू नये, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून चारा बियाण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून 12500 हेक्टरवर चारा लागवड होणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याला प्रत्येकी चार हजारांचे मका बियाणे पुरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कृषी विभागाच्या पीकपेरानुसार आपल्याकडे पुढील सात महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे. याशिवाय जिल्हा नियोजनमधून शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे दिली जाणार आहेत. यातून साधारणतः साडेबारा हजार हेक्टरवर चारा पिके घेतली जातील. चारा साक्षरता अभियान सुरू आहे. यातून वाळलेल्या चाऱ्याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. हा चाराही उपलब्ध होणार आहे.डॉ. उमेश पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अहिल्यानगर