महायुतीत हरलेल्या जागाही ठरणार निर्णायक  Election File Photo
मुंबई

Maharashtra Legislative Assembly : महायुतीत हरलेल्या जागाही ठरणार निर्णायक

पुढारी वृत्तसेवा
प्रमोद चुंचूवार

मुंबई : महायुतीत जागावाटपावरून चर्चा सुरू झाली असली तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेली मते आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या व दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावरील जागाही महत्त्वाच्या ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागावाटप करणे हीच सर्वात मोठी डोकेदुखी महायुतीतील अन्य घटक पक्षांसाठी ठरणार आहे.

भाजपने यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी 170 पर्यंत जागांबाबत आग्रही भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या निवडणुकीत तत्कालीन युतीत भाजपने 164, तर शिवसेनेने 124 जागा लढल्या होत्या. त्यातून भाजपने 105 जागा जिंकल्या, तर 59 जागांवर त्यांचा पराभव झाला होता. शिवसेना 56 जागा जिंकताना 68 जागांवर पराभूत झाली होती.

निवडणुकीच्या जागावाटपात साधारणतः ‘सिटिंग गेटिंग’ (जिंकलेल्या जागा त्याच पक्षाला मिळणे) हे सूत्र वापरले जाते. यासोबतच गेल्या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावरील जागाही जागावाटपातील चर्चेस येऊ शकतात. भाजपचे उमेदवार 55 जागांवर दुसर्‍या क्रमांकावर होते. त्यामुळे हक्काच्या 105 जागांसबोत भाजप या 55 पैकी अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करेल, असे मानले जाते.

दुसर्‍या क्रमांकाचे मूल्यमापन

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 56 जागा जिंकणारी अविभाजित शिवसेना 54 जागांवर दुसर्‍या स्थानी होती. आता हा पक्ष जिंकलेल्या जागांसह दुसर्‍या क्रमांकावरील 54 जागांतील अधिकाधिक जागा मिळण्यासाठी जोर लावेल, हे निश्चित आहे. 2019 मध्ये अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकताना 47 जागांवर दुसरा क्रमांक मिळविला होता. यावेळी राष्ट्रवादीही जिंकलेल्या जागांसोबतच दुसर्‍या क्रमांकावरील जागांवर हक्क सांगेल.

शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटल्याने त्यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा करताना त्यांच्यासोबत आलेले आमदार लक्षात घेतले जातीलच. सोबतच हे पक्ष दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या 101 मतदारसंघातील या पक्षांची आजची स्थितीही विचारात घेतली जाऊ शकते. दुसर्‍या क्रमांकाची मते मिळविणारे उमेदवार वा नेते आता महायुतीतील शिवसेना वा राष्ट्रवादीसोबत आहेत की महाविकास आघाडीतील शिवसेना वा राष्ट्रवादीसोबत हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

अशातच या 101 पैकी ज्या जागा भाजपने 2019 मध्ये जिंकल्या असतील तेथे या दोन्ही पक्षांची दावेदारी संपुष्टात येणार आहे. त्याच धर्तीवर भाजप दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ज्या जागा शिंदे किंवा अजित पवार गटाने जिंकल्या असतील तेथे भाजपलाही दावेदारी करता येणार नाही. त्यामुळे जिंकलेल्या जागांसोबतच हरलेल्या जागांचेही राजकीय मूल्यमापन आता महायुतीने सुरू केले आहे.

राष्ट्रवादीसोबत जागावाटपाची डोकेदुखी

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढल्याने त्यांच्यात संघर्षाची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादीविरोधात लढताना शिवसेना वा भाजपचे उमेदवार काही ठिकाणी जिंकले, तर काही ठिकाणी हरले होते. राष्ट्रवादीसोबतच पारंपरिक राजकीय स्पर्धा विविध विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळते.

हा पक्ष आता मित्रपक्ष झाला असला तरी गावागावातील राजकीय समीकरणे बदललेली नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीविरुद्ध भाजप-शिंदे सेना यांच्या राजकीय संघर्षावर तोडगा काढणे तीनही पक्षांच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.भाजप-शिंदे सेनेच्या उमेदवारांचा 2019 मध्ये जेथे राष्ट्रवादीने पराभव केला तेथे आपल्या उमेदवारांना आता शांत कसे करायचे, बंडखोरी कशी टाळायची हा प्रश्नही महायुतीतील नेत्यांसमोर आहे. उदा. 2019 मध्ये तत्कालीन समाजकल्याण मंत्री भाजपचे राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी 718 मतांनी पराभव केला होता. आता चंद्रिकापुरे अजित पवारांसोबत आहेत, तर या जागेवरील दावा सोडणे भाजपला अडचणीचे जाणार आहे. अशा अनेक जागा असतील ज्यात महायुतीतील मित्रपक्षांना अतंर्गत संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT